Saturday, 27 June 2015

गोवळकोंडा - दखनी शिलापर्वत

# # # # #

काळ येतो. जातो.

माणसे आणि त्यांच्या महत्वाकांक्षा बदलत जातात.

सगळं अनिश्चित – अनित्य असूनही घडलेल्या घटना – काही जगलेली आयुष्यं आपसूक जपली जातात.
तसा काळाचा शाप सर्वांसाठीच नित्य. कुणालाही न चुकणारा. शेकडो युद्धे हरून – जिंकून जगावर राज्य मिळवलं  तरी त्यालाही तो शाप लागू.

सिकंदराचे हात त्याच्या कॉफिन खाली लोंबकळत राहतात शेवटी. जगज्जेत्याचेही हात रिकामेच.

# # # # #

तिलांगणातले अजस्र शिळांचे डोंगर म्हणजे एक अद्भुत दृश्य.

नल्लरायि – म्हणजे शब्दशः काळा दगड. ग्रेनाईट. आणि मजा म्हणजे नल्ल – या शब्दाचा तमिळ अर्थ चांगला, मंगल. कदाचित मग काळा रंग आणि मंगल याचं दक्षिणेत काही वेगळं नातं असावं का?

दक्खनच्या पठाराची बुलंदी दाखवून देत या शिळा वर्षानुवर्ष इथेच पडून आहेत. झालं असं की, या शिळा म्हणजे माणसाला त्याच्या निवार्यासाठी भलत्याच आधाराच्या झाल्या. त्यांच्या गुहा – कपारींमधून वस्त्या होत गेल्या. यात अगदी दोनेक हजार वर्षं मागे जाता येईल. अजिंठा – वेरूळ च्या काळापर्यंत.

देवगिरीचे यादव जेव्हा दक्खन च्या पठारावर राज्यकर्ते होते तेव्हाची गोष्ट. सध्याचा तिलंगण चा भाग तेव्हा काकतीय साम्राज्यात येत असे. राणी रुद्रम्मा देवीचं साम्राज्य. ओरुगाल्लू ही त्यांची राजधानी. सध्या हे शहर वरंगल म्हणून ओळखलं जातं. काकतीय साम्राज्याच्या चारही दिशा अभेद्य असाव्यात ही राजा प्रताप रुद्राची इच्छा होती. त्यानुसार पश्चिमेकडचा एक डोंगर निश्चित करण्यात आला. त्यावर पूर्वी गवळी लोक मातीची घरे बांधून राहत असत. गोल्लाकोंडा हे त्या वस्तीचं नाव. तिथे चिरेबंदी भिंत बांधून त्या डोंगराचं एका किल्ल्यात रुपांतर केलं गेलं. गड वसता झाला. इसवी सनाचं सुमारे बारावं शतक. काकतीय साम्राज्याचा सुवर्णकाळ. नंतर लागलेली उतरती कळा अन मग शेवटी अस्त. आणि किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. अगदी तेव्हापासून ह्या अतिप्रचंड शिळा हा बदलता काळ पहात आहेत.

PC - http://www.yadavhistory.com/state_wise_history/andhra_pradesh


# # # # #

     हिरे. दगडी कोळशाच बदलेलं रूप. इतिहासात असं कोणतंच रत्न नसेल की ज्यासाठी इतका भयानक रक्तपात झाला असेल. ब्लड डायमंड. हिर्याची चमचमती भूल म्हणजे जीवाशी खेळ. आंध्रभूमी ही अगदी पहिल्यापासून हिर्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. कोह – इ – नूर, (कोह = पर्वत , नूर - चमक) एक तुकडा सध्या ब्रिटीश क्वीन च्या शिरपेचात आहे, तोही इथलाच. कोल्लूर च्या खाणीतला. आणि बरेच जगप्रसिद्ध हिरे इथलेच.

# # # # #

     कुली कुतुबशाहीचं राज्य हैदराबाद वर होतं तेव्हा खरं गोवलकोंडा किल्ला विशेष करून बांधला गेला. इथली मस्जिद, दिवान – ए – आम, दिवान – ए – खास, अंबरखाना, कोठी हे सगळं त्या काळात बांधलं गेलं. कररचना, प्रशासन आलं. त्यानुसार सरदार नेमले गेले.

PC - www.indialine.com

PC - www.historicaltimeofindia.com

     त्यातलाच एक अक्कण्णा मादण्णा, ज्याने करवसुली करून ती गरीबांमध्ये वाटून टाकली असे म्हणतात, त्याला या कृत्याबद्दल कुतुबशाहीने चौदा वर्ष कैदेची सजा सुनावली होती. त्याची कोठडी ही तिथेच आहे. त्याने आतल्या भिंतींवर दगडाच्या सहाय्याने कोरून मूर्ती काढल्या आहेत. काळाच्या ओघात त्यावर शेंदूर फासून त्यांची पूजा करणं आलंच.
PC - www.thrillophilia.com

 दरबारात उभा राहून डोंगराखालच्या दृश्यावर नजर टाकली की, एकीकडे राणीवसा दिसतो. राण्यांचे महाल. उजाड झालेल्या, पडल्या झडल्या भिंतीतून आजही कुतुबशाही चं वैभव दिसून येतं. बांधकामा वरचा मुघल प्रभाव तर आहेच, पण ध्वनिशास्त्राचा त्याचा अभ्यास पाहून थक्क व्हायला होतं. न्यायनिवाडा जिथे व्हायचा तिथे आरोपीला बरोबर एका घुमटाकार छताखाली उभा केला जाई. आणि अगदी त्याचा अंगरखा जरी हलला, तरी त्याचा आवाज अगदी लाऊडस्पीकर मधून आल्यासारखा यायचा. म्हणजे तो अजूनही येतो. वाटाडे हा आवाज आपल्या सदरऱ्यावर हि काढून दाखवतात. ही सावधानता म्हणून उपयोगाला येण्यासारखी युक्ती. जर आरोपीने सजा ऐकून बचावासाठी तालावर वगैरे काढली, तरी त्याचा आवाज व्हावा म्हणून.

PC - www.mithunonthe.net

      ध्वनीचा अजून एक आविष्कार म्हणजे प्रवेश द्वाराच्या घुमटा खाली थांबून जर कोणी टाळी वाजवली तर ती अगदी डोंगरावर असणाऱ्या दिवान ए आम पर्यंत स्पष्ट ऐकू जाते. सगळी घुमटाच्या पैलूदार रचनेची करामत. आवाज त्यातल्या रकान्यांमध्ये घुमत राहून मोठा होत जातो. ( सायन्स वाल्यांसाठी = Constructive Interference happens when two coherent sound waves are superimposed) हे सगळं ज्ञान इतकं explicit नसलं  तरी implicitly त्यांनी जाणून घेऊन अशा रचना तयार केल्या होत्या हे निश्चित.
PC - www.tripadvisor.com


# # # # #


Sunday, 23 November 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे...



     

   
    

      मास्लोव ने सर्वप्रथम मानवी गरजांची यादी तयार केली. त्यात हवा, पाणी, आणि अन्न या गरजा अगदी प्राथमिक आहेत. त्यानंतर येते ती सुरक्षितता. सुरक्षिततेची गरज भागली, कि मग माणसाला सामाजिक आयुष्याची गरज असते. त्यानंतर स्वाभिमान, त्यानंतर स्व – निश्चितता. आणि सर्वात शेवटी स्पिरिचुअल, म्हणजे आत्मिक ज्ञान.

    सामान्य म्हणजे तुमच्या आमच्या सारखे लोक, पहिल्या तीन पातळ्यांवरच जगणारे. काही कळत तर काही नकळत. आणि कळून तरी काय उपयोग? अगदी प्रत्येकाचं अर्धं आयुष्य पहिल्या तीन पातळ्यांवरच संपून जाणारं.

    अगदी लहानपणापासूनचा प्रश्न. मोठं झाल्यावर कोण व्हायचं तुला? अर्थात डॉक्टर, इंजिनियर आणि हल्ली हल्ली एरोनोटिकल इंजिनियर, कार्डीओलोजीस्ट, एम्बेडेड सिस्टमस स्पेशालीस्ट... 

     स्वप्नही अगदी कॉम्प्लेक्स.

     ही माझी पिढी.

     आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स स्वप्नांचं फ्युचर काय? हवा, अन्न, पाणी, निवारा आणि सुरक्षितता. मास्लोव ने दर्शवलेल्या -

     पहिल्या – तीन - पातळ्या. एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्या वरही पोहोचता येतं याचा विचार आजही जरासा अप्रचलित.

     आणि हे सगळं ज्यांना कळतंय (अगदी माझ्यासकट), त्यांचा त्यावर एक चतुर शेरा. सिस्टमच अशी आहे तर आपण तरी काय करणार ना?

# # # # #

     डॉ. प्रकाश बाबा आमटे.

     वडिलांनी पाहिलेलं स्वप्न स्वतःच आयुष्यं बनवून ते जगणारी मुलं असू शकतात कुठे? त्यासाठी आपलं वैयक्तिक आयुष्य पणाला लागलं तरी? एका व्यापक अर्थाने चांगल्या भविष्यकाळासाठी स्वतःच सुखासीन भविष्य बाजूला ठेवू शकतं कोणी? व्यक्तिगत स्थैर्य शोधण्याच्या अनादी मानवी इच्छेला कुणी इतकं रीप्रेस करू शकतं?

     जेव्हा थंडीने काकडणारं उघडं नागडं पोर पाहून स्वतःच्या कपडे घालण्याची लाज वाटायला लागते तेव्हा मास्लोव ने सांगितलेल्या गरजांच्या तक्त्यात आपण सर्वोच्च पातळीवर राहून आपण शोधत असतो. शोधत असतो मानवी जीवनाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात आपली भूमिका. सेल्फ क्रायसिस म्हणजे शेवटी काय?

     शेवटी मनातल्या अगणित सुट्या दोऱ्यांची एकत्र गाठ मारणारा हा सिनेमा. माणूस म्हणून आपली ओळख काय, जगण्यासाठी लागणारं धैर्य कसं मिळवावं, आणि संपूर्ण समाजाच्या तुलनेत आपलं स्थान काय हे समजणं म्हणजे मोठं होणं.

     सफरचंद कधी डोक्यावर पडतंय याची वाट पाहणारी माझी पिढी. आपापल्या करियर मध्ये एक फार चांगलं काहीतरी होणार आहे अशी आशा मनात बाळगून असलेली. पर्सिवरन्स ठेवला तर सगळं काही शक्य आहे, नाही का?

# # # # #



Sunday, 31 August 2014

चांदवा




# # # # #

खरंच. पावसाचा आवाज कागदावर कसा लिहायचा?

     तरीही धो धो धो पडणारा पाउस कानात साठला की मग तो मनातून वाहायला लागतो. मनाचे हजारो कप्पे. दरवेळी नवीन दार उघडं आहेच. अजून माझंच असून मलाही त्यांची पुरती मोजदाद नाही. कधी कोणती खोली उघडेल आणि पडद्यामागून पडदे बाजूला सरत काय समोर येईल याचा अंदाज कुणी कसा लावावा? नक्कीच मनाचही काही सनातन संचित आपल्या पूर्वजांकडून आपल्यात उतरत असलं पाहिजे. काही अमूर्त आठवणी... काळवेळेपलीकडच्या. काही प्रसंग आणि कधी कधी काही व्यक्तीही.

     सुरुवातीच्या अगदी अपरिचित व्यक्ती प्रत्येक भेटीनंतर वेगळ्या वेगळ्या वाटत गेल्या. परिस्थितीनुसार त्यांच्या चेहऱ्याला अगणित संदर्भ. पुस्तक वाचता वाचता कंटाळून मध्येच एखादा बुकमार्क टाकून पुस्तक ठेवून द्यावं. पुढच्या वेळी निराळंच पान उघडून पुन्हा नवा बुकमार्क. प्रत्येकच चेहेरा असा बुकमार्क ने भरलेलाय. प्रत्येकाचा वेगळा संदर्भ... कुणाकडून काय घेणारेस अन किती? बघ ते. पुन्हा एका चेहऱ्यावर दिलासा देणारं स्मित उमटलं अन त्यापाठोपाठ कित्तीतरी नवीन कोडी... क्या ब्बात है जनाब.

# # # # #

     दुपारच्या जेवणानंतर आलेली झिंग उतरवायला चहाचा डोस उपयोगी असतो. त्यातून इथले इराणी चहावाले चहा बनवण्यात मातब्बर. रस्त्यातन चालता चालता नुसत्या वासाने चहाची तलब झाली नाही असं शक्य नाही. एकीकडे मलईदार दूध खळाखळा उकळत असताना दुसरीकडे चहाचं “डिकाशन” (Decoction) एका तोटी वाल्या टाकीत ओतलं जातंय... चाय ची ऑर्डर दिल्या दिल्या पळीने दूध आणि वरची थोडी मलई कपात आणि मग त्यावर “डिकाशन”. बाजूला वरखाली करून मिसळायला दुसरा कप. आणि असा चहा दोन मिनिटात हजर. पहिल्याच “सिप” मध्ये ताजेतवाने.

     तमातून ज्योतीकडे नेणारं कलियुगातल अमृत काय असेल तर हे.

# # # # #

Monday, 9 December 2013

मन मनास...

दिवाळीचे उजळलेले दिवस परत जाताना उन्हं कलती करून जातात.

     सकाळच्या नव्या हवेत साचलेलं मऊशार गडद धुकं. लोण्याप्रमाणं धुक्यात वितळत जाणारं ऊन. चालता चालता थबकून मी तळ्याच्या काठी उभा राहतो. झाडा झुडूपांशी सलगी करत विस्तीर्ण पसरलेलं तळं. तळ्याच्या त्या काठाला मला लांबवर रस्ता दिसतो. ह्या असल्या थंडीतही रस्ता जगण्याचा ओघ वाहून नेतोच आहे. मी सावकाश नजर खाली वळवतो. तळ्यात अस्थिर असं माझं प्रतिबिंब. पहाटवाऱ्यामुळे ते हलतंय की आतली अस्थिरता तळ्याच्याही नजरेतून सुटली नाही कोण जाणे?... तसल्या दाठूरत्या थंडीतही माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. प्रतिबिंब मला पाहून विचारतं, “कोण आहेस तू? तुला काय हवंय?”

     मी उलट त्यालाच विचारलं, “कुणाच्या सापेक्ष मी कोण आहे म्हणून सांगू?” ते नुसतंच हसलं. तेही बहुधा माझ्याच जातकुळीतलं असावं. कुणीसं लिहून ठेवलंय, तुम्हीही जगाचाच एक भाग आहात, निर्जीवांपेक्षा तुमच्यात फक्तं एकच गोष्ट वेगळी आहे, तुमच्यात जीव आहे. बाकी तुम्हीही अणुरेणूंचा एक पुंजकाच. त्यांच्यासारखे. म्हणूनच कदाचित त्यांनाही दुःखाची जाण असेलच की. म्हणूनच दुःखाने पोळलेल्या अशाच एखाद्या हतबल जीवाने अथांगाकडे कधीकाळी याचना केली असेल... “मा कश्चित दुःखमाप्नुयात...”

     सूर्य जसजसा आकाशात वर आला, तसतसं हळूहळू धुकं विरून गेलं, तळ्याचा सभोवार लख्ख झाला. खरंच, जग उजळायचं असेल, तर दूरवर एखाद्या सूर्याला जबाबदारीनं रात्रंदिवस जळावंच लागतं. त्याचं कोणाला महत्त्व नसेलही, पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर? भयंकर कल्पना. मी मागे फिरलो. झाडांखालच्या मळलेल्या पाऊलवाटांवर चालताना झाडांतून पाझरणारे नाजूक कवडसे. पाचोळ्यात माझी पावलं वाजली, तसं बाजूच्या झाडावरून फडफड करत शेकडो बगळे आकाशात उंचच उंच उडाले, सुंदर दृश्य पाहून मी समोर नजर वळवली तर समोरचं झाड निष्पर्ण. अगदी एकाही फांदीला एकही पान शिल्लक नाही. दुर्दैव. मी म्हणालो. पण ते म्हणालं, “माझ्या डोळ्यांत वसंताची स्वप्नं आहेत.”

     मागे फिरून एकदा या सगळ्या दृश्यावर नजर टाकली.

     “पितात सारे गोड हिवाळा...”

Friday, 18 October 2013

खा खा

# # # # #


     दिवसभराच्या कामानंतर चेहेऱ्यावर पसरलेला मख्ख थकवा घेऊन मी नवीन बुटाच्या आत दुखणाऱ्या पायाकडं साफ दुर्लक्ष करत डी. आर. डी. ओ. चौकात बसची वाट पाहत असतो. कामाचा ताण घालवण्यासाठी कानात अखंड वाजणारे शंकर महादेवन, सोना महापात्रा, श्रेया घोषाल...

     नेहेमीप्रमाणे बसचा रश अवर. चुकूनमाकून थांब्याला बस लागलीच तर जणू बालापूरला चौरस्त्याला जाणारी ती जगातली शेवटची बस असल्याप्रमाणे लोकांची गर्दी. शिवाय एवढ्या दिव्यातून बसमध्ये जागा मिळालीच, आणि एखाद्या म्हातारबुवांनी वगैरे जागा मागितलीच, तर “ ओके अंकल, कूरचोअंदी” (म्हणजे बसा; तेलुगु) म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एखाद्या unfortunate दिवशी मग शेअर ऑटोनेच जायचं, असं माझं आणि शाहीदचं ठरतं.

     “अबे रोक उस ऑटोको...” – असं मला म्हणून “आपेंडी आपेंडी” (थांबवा; तेलुगु) असं स्वतःच करत कपूर ती गच्च भरलेली केविलवाणी ऑटो थांबवायचा “ऑटोकाट” प्रयत्न करतो. अशा दोन तीन भरगच्च ऑटो आणि मग सरतेशेवटी खास आमच्यासाठी आली असावी अशी एखादी रिकामी शेअर ऑटो.

     अभिषेक कपूर. खाण्याचे पदार्थ शोधणाऱ्याला जर नोबेल मिळत असतं तर यंदाचं नोबेल त्याच्या “बन–बोंडा” या शोधासाठी त्याला नक्की मिळालं असतं.
www.blendwithspices.com
     बन–बोंडा म्हणजे अभिषेक कपूर या माझ्या उत्तर भारतीय मित्राने जमवून आणलेलं मराठमोळ्या वडा–पावचं तिलंगणातलं रूप. चौघात मिळून अर्धा डझन बनपाव घेतले आणि तितकेच बोंडे (बोंडे? – अनेकवचनासाठी माफी) घेतले की मग संध्याकाळी भातासोबत कसली आंबट-चिंबट करी खायला मिळेल याची चिंता करायची जास्त आवश्यकता नसते. आंबट चव म्हणजे तेलुगु लोकांचा जीव की प्राण. अगदी चटण्यांपासून भाज्यांपर्यंत सगळं आंबट ढाण!

     त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे चिकन बिर्याणी. सिकंदराबाद स्टेशन च्या बाहेर अल्फा म्हणून एक फेमस बिर्याणी चं हॉटेल आहे. एकदा सिकंदराबाद ला गेलो तेव्हा आणि परत निघताना अश्या दोन्ही वेळेस जायला मिळालं. चिकन बिर्याणी तर टेस्टी होतीच होती पण व्हेज बिर्याणीही त्याचा तोडीस तोड!

# # # # #

     रंगल च्या चौरस्त्याला गेलं, कि तिथे कोपर्यावर एक अल्टीमेट फास्ट फूड ची टपरी आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद, अभिषेक, दीपक आणि मी मिळून तिकडे गेलो तेव्हा बोंडा खाल्ला होता. आतापर्यंत माझी आणि बोन्ड्याची ओळख पुण्यात मिळणाऱ्या “आलू बोन्ड्यापर्यंत” मर्यादित. पण इथला बोंडा हा तांदळाच्या आंबवलेल्या पिठापासून तयार केलेला. भुकेच्या तावात तिसरी प्लेट संपवताना आम्ही चौघेही या डीशच्या प्रेमात पडलो. शिवाय एवढं खाऊनही मी शेवटी निर्लज्जपणे मसाला डोसा मागवला. उत्तरेकडच्या मसाला डोशाच्या तोंडात मारेल इतकी सुंदर टेस्ट. नुसता मसाला खाऊनच हायसं वाटलं. खरं डोशात भरायच्या सुक्या बटाट्याच्या भाजीला “मसाला” का म्हणायचं हा प्रश्न असला, तरी हा मसाला तयार करण्यात इकडचे लोक माहीर.

www.sree-srecipes.blogspot.com



# # # # #

Saturday, 3 August 2013

बोलावणं

“जित्यापणी पाणी पाजायला कुणाला फुरसत नसती. सगळे आपापल्या परपंच्यात असत्यात! मेल्यालं माणूस कधी पाणी प्येतय व्हय? आन ते काय! हाताला येईल तो फटकूर कुणी कधी धुतल्याला असतोय का नसतोय त्यात पाणी पिळायला दहा जणांचे हात! अर्ध पाणी तोंडात न अर्ध भाईर! अशा तर्हा, कशाचं काय आलंय? मेलं म्हजी गेलं.”

या ओळी वाचल्या अन तासभर कानात घुमत राहिल्या.

जिनं हे म्हटलं तिलाही शेवटी त्याच पद्धतीनं पाणी पाजण्यात आलं. मरण. प्रत्येकासाठी अटळ.

# # # # #

पल्या सर्वांच्याच आयुष्यात एका “आई” चं स्थान ती नसते तेव्हाच कळणारं. एरवी सगळे आपापल्या प्रपंचात गढून गेलेले असतात. नरेंद्र जाधव म्हणतात त्याप्रमाणे आई ही आपल्या जगण्याच्या रेल्वेचं जणू “अनसीन इंजिन” असतं. रावसाहेब ससाणे यांनी त्यांच्या “बोलावणं” या पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या आईचं जाणं अन त्यायोगे आईचं संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवलंय.
माझ्या नगरच्या आत्याचे मिस्टर डॉ. अनिल ससाणे, रावसाहेब ससाणे हे त्यांचे भाऊ. त्यांच्या आई भीमाबाई यांच्या सहवासात मला कधी राहण्याचा प्रसंग आला नसला तरी, तरी त्या सर्वांनाच फार जीव लावायच्या असं मी बाई, बाबा, आणि माझ्या सगळ्याच माणसांकडून ऐकलंय. आणि आता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांनी जगलेल्या आयुष्याचं पर्व अगदी जसंच्या तसं वाचायला मिळालं.

गावाकडच्या चालीरीती, महार म्हणून भाकरीच्या उद्देशाने करावी लागलेली गावकीची कामे, बाबासाहेबांच्या शिकवणुकीतून वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे, त्यांनी गावकीची कामे नाकारण्याचा दिलेला संदेश, तरीही कुटुंब चालवता यावे म्हणून म्हातार्याला(लेखकाचे आजोबा) करावी लागलेली गावकी, त्यातून उद्भवलेले कौटुंबिक वाद, वाळीत टाकलं जाणं, तरीही म्हातार्याने खंबीरपणे त्या सगळ्यांशी लढून पुढे नेलेलं कुटुंब... वाचता वाचता अनेकदा रडूही येतं.

तर काही प्रसंग मजेशीर. उदाहरणार्थ सौन्दराबाईचं अंगात येणं, तिचं भूतं पळवून लावणं, यासारखे अनेक.

एक चांगलं पुस्तक.
# # # # #



Wednesday, 12 June 2013

तो फोन आणि हा फोन...

यडिया चं असूनसुद्धा माझ्या सिमकार्ड नं मला द्यायचा तो दगा दिलाच. ऐन प्रोजेक्ट च्या वेळी No Service चा मेसेज!!! बरं, सुट्ट्या असल्याने माझ्या आजू बाजूच्या रूम्स मधली लोकं आपापल्या घरी गेलेली. आणि त्यातनं मी सिंहगड रोड पासनं साधारण किलोमीटर भर आत वडगाव मध्ये राहत असल्यानं मला STD बूथ शोधत हिंडण्याशिवाय पर्याय नव्हता.

     सुमारे निम्मं वडगाव पालथं घालून झालं. कुठेच बूथ दिसेना. बरं, बूथ असलाच तर त्याला टाळं लागलेलं. आणि त्या बंद पडलेल्या STD ला वाकुल्या दाखवत त्यांच्याच नाकाखाली उभी असलेली Mobile ची दुकानं. क्वचित कुठेतरी PCO चा बोर्ड. आणि तिथे चौकशी केली तर म्हणे फक्त  FAX पुरताच चालूये म्हणे फोन! वरून धो धो पडणारा पाउस, आणि छत्रीखालून दुकानांचे बोर्ड वाचत फिरणारा मी.

    संपर्क साधनांच्या क्रांतीने टेलिफोन चे बूथ म्हणजे अडगळ हे ठरवूनच टाकलं होतं कदाचित. पण असल्या धांदलीत पण मला माझं लहानपण आठवलं. घरात पाहिलं टेलिफोन कनेक्शन आलं, त्याचं केवढं कौतुक! आलेला प्रत्येक फोन पहिल्यांदा मीच उचलून hello म्हणण्यासाठी माझी धडपड असायची. हे मोबाईल वगैरे आत्ता आत्ता चे. आणि या टेलिफोन ची झालेली ही केविलवाणी अवस्था!!! चक्क Antique म्हणून फोन चं device दिवाणखान्यात मांडलेलं!

     बरं, असल्या landline चा आणखी एक फायदा असा कि ते एका जागी फिक्स केलेले असायचे. miscall देऊन त्यांच्या आवाजाचा मागोवा घेत त्यांना घरभर शोधत हिंडाव लागत नसायचं. त्याची जागा ठरलेली! शिवाय त्यांची चोरी वगैरे ही तर गोष्ट लांबच राहिली.

     आजकाल तर मोबाईल पण smart झाले!!! Net Connectivity आली तसं मग फेसबुक, We chat,  आणि Whatsapp. फोन उचलून बोलायलाही नको. फक्त मेसेज type करून सेंड चं बटन दाबायची खोटी.

     बदलत्या काळाला माझं नमन असो अश्या अर्थाचं एक सुभाषित आहे... तेच माझ्या नुकत्याच सुरु झालेल्या so called smart फोन मधून “Google” करतोय!!!

Friday, 8 March 2013

भूतकाळातला प्रवास


कोण म्हणतं कि time travel ही एक fantasy आहे?

     Time travel म्हणजे हॉलिवूडी fantasy पटात  दाखवल्या जाणाऱ्या मोठमोठाल्या मशिनिंमधून एकदम फाटकन time travel करणं, एवढंच नाही. कधी घरातली एखादी खोली आवरायला घ्या. एरवी अडगळ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी घड्याळाचे काटे मागे फिरवत नेतात. पहिली पानं उलटून पाहत “कोरीच तर आहे” करून वापरायला काढलेल्या जुन्या डायरीची मागची पानं abstract art कधी झालेली असतात काही कळत नाही. कधीकाळच्या कुणाच्या व्यक्त-अव्यक्त भावनांनी त्यांची शेवटची पानं गच्च.

     “झालं. आता ही एवढी रद्दी बांधली की झालंच” असं म्हणत जुन्या वह्यांचे गठ्ठे उचलताना एखादी rather जुनाट म्हणजे अगदी जीर्ण झालेली वही हातात येते. “बघू तरी काय आहे ते” .. पानांमागून पानं उलटताना पुन्हा kaleidoscope चा आविष्कार. पहिल्या पानावर बारीक बारीक अक्षरांत पद्मा गोळ्यांची कविता कुणा रसिक मनानं तिथं लिहून काढलेली असते,

“इतकी बेपर्वाई आकाशालाच शोभणारी...
तुही स्वतःला आकाश समजू लागलास का
मी म्हटले म्हणून?
कितीही म्हटले परस्परांना अलौकिक असामान्य...
तरी मूळ मातीतच
हे तुला कळत नाही असे का मी म्हणते?
एक विचारू?
कलंदराला हवीच का असली बेपर्वाई?
आकाशाची पोकळ पोकळ निळाई?
चिडले नाही रे..
चंद्र-सूर्य पाहते न मी तुझ्याच डोळ्यांत?
चंद्र-सूर्याला का दिसावीत आसवं कोणाच्या डोळ्यातली?
मातीचे मुके कढ मातीच जाणे...
... पण तू आकाशच राहा
नाहीतर मी डोळे उचलून पहायचे तरी कोणाकडे?”

     कविता वाचत वाचत मनानं कवितेत हरवून जावं तर अगदी पुढच्याच दोन पानांवर “कैरीचा तक्कू” कसा बनवायचा याची कृती लिहिलेली. अन त्यापाठोपाठ रसलिंबू, पोह्याचे पापड... यांच्या कृती. त्याच्याच पुढच्या पानावर आठवून आठवून लिहिलेला महिन्याचा हिशेब. “७ तारीख – दूध अर्धा लिटर जास्त” अशा सांकेतिक वाटणाऱ्या मेमोजनी वही अजूनच interesting झालेली. अन अश्या साताठ वह्या अडगळीत. प्रत्येक वही आधीपेक्षा जास्त nostalgic... घर आवरायचं म्हणजे खरं निवांत एखादा दिवसच काढायला हवा.

     कुठल्यातरी कोपऱ्यात सापडणारा पत्त्यांचा क्याट. अन सापडला म्हणून खेळलेला एखादा रमीचा डाव.

     सगळ्यात महत्वाचं आणि मला आवडणारं काम म्हणजे एक्सपायरी डेट झालेली औषधं फेकून देणं. कधी कुणी न बघता घेतली तर पंचाईत नको म्हणून जुनी औषधं धडाधड फेकून देता येतात. पण अडगळीत नवनवीन सापडणाऱ्या वस्तूंनी ताज्या होत जाणाऱ्या आठवणी. या असल्या आठवणी थोड्याच एक्सपायरी डेटसोबत येतात? फेकून द्यायचं म्हटलं तरी न फेकता येणाऱ्या आठवणींची अडगळ. आयुष्यात कधीही न साफ होणारी. सगळे जुने दिवस जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे करणाऱ्या आठवणी.

     घर आवरताना आठवणींच्या कोळीष्टकामध्ये आपसूकच गुंतून जायला होतं. एका झाडूच्या फटक्यासरशी ती कुठली उडून जायला?

Wednesday, 10 October 2012

श्रीरंजन चा वाढदिवस.


श्रीरंजन आवटे.

माझा ज्युनिअर कॉलेज ला असल्यापासून चा मित्र . त्याचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी किंवा आम्हा सर्वांसाठी एक फार चांगली वेळ असते. कारण त्याचा वाढदिवस म्हणजे खरंच “वाढ”-“दिवस” ची खरीखुरी संकल्पना काय आहे हे समजावून देणारा असतो.

मुळातच श्री हा एक unconventional आणि कुठल्याही गोष्टीबद्दल स्वतःची अशी (आणि तीसुद्धा ठाम!!!) मते असणारा मला भेटलेला माझ्या वयाचा एकमेव मनुष्य आहे. Unconventional  यासाठी की बरोबरीचे सगळे engineering ला जात असताना त्याने modern college ला मिळालेलं admission सोडून फर्ग्युसन कॉलेज ला B.Sc. ला जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज त्याच्याकडे पाहिलं की त्याने घेतलेला निर्णय किती योग्य होता हे कळतं.

वाढदिवस म्हटला की केक, पाहुणे आणि मित्रांना पार्टी, आणि बर्थडे बम्प्स ह्या एवढ्याच गोष्टी “फन” म्हणून होणाऱ्या वाढदिवसांपेक्षा हा खराखुरा वाढदिवस मला भलताच आवडतो.

होतं असं, की त्याच्या वाढदिवसाला सगळ्या वयोगटातली लोकं, म्हणजे त्याचे आई बाबा, मावशी, आम्ही मित्रमंडळी, त्याची लहान बहिण श्रुती, कधी कधी त्याचे चुलत / मावस भाऊ-बहिणी असे सगळेजण निवांत सतरंजी वगैरे टाकून गोल करून बसतात. काव्यवाचनाचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षभरात ज्या काही कविता केल्या, प्रत्येकजण आपापल्या कविता वाचून दाखवतो. श्री चे बाबा म्हणजे कवितेतला मानदंड! त्यांचा धम्मधारा हा कवितासंग्रह गेल्याच वर्षी रावसाहेब कसब्यांच्या आणि सतीश काळसेकरांच्या हस्ते एस एम जोशी मध्ये प्रकाशित झाला. त्यांच्या कविता त्यांच्याच तोंडून ऐकायच्या म्हणजे सोने पे सुहागा!

तसा कवितांच्या बाबतीत श्री पण काही कमी नाही. नुकतच त्याच्या कवितांसाठी एका दिवाळी अंकाचं पत्र त्याला आलंय.

मग या कविता-गप्पा-विनोद ( विनय च्या भाषेत बोलायचं, तर बौद्धिक टिंगलटवाळक्या) सुरु असताना मध्येच काकूंची लगबग सुरु होते आणि मग पाव-भाजी किंवा वडा-पाव, आईसक्रीम serve होतं. खाता खाता मग श्रुतीचं गाणं, (ती छान गाते),एक दोन उत्तम काव्यसंग्रह circulate होत असतात, ते चाळायचे, अन मग पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरु. श्री चे almost सगळेच मित्र political science ला आहेत. त्यामुळं गांधीवाद, आम्बेडकरवाद काही चळवळीतल्या, बंडखोर कविता हेही ऐकायला मिळतं. आता यावेळी गणेशदा लवकर निघाले, (तब्येत बरी नव्हती) पण गेल्या वर्षी त्यांनी गालिब ची “हजारो ख्वाहिशे ऐसी” ही गझल खूप छान म्हंटली होती.

“हजारो ख्वाहिशे ऐसी
की हर ख्वाहिश पे दम निकले
बोहोत निकले मेरे अरमा लेकीन फिर भी कम निकले
निकलना खुल्द से आदम का सुनते आये थे लेकीन
बोहोत बे-आबरू होकर तेरे कूचे से हम निकले...”

मी तर त्या गझलचा अन तेव्हापासून मिर्झा गालिबचाही fan होऊन गेलो.

गेल्या वर्षी भैरुरतन दमाणी पुरस्काराचे मानकरी ठरलेले कवी नागराज मंजुळे ह्यांना मी श्री च्या बर्थडे(गेल्या वर्षीचा) मुळे भेटू शकलो. त्यांचा “उन्हाच्या कटाविरुद्ध”, हा काव्यसंग्रह वाचायला मिळाला, आणि तेव्हा त्यांनी स्वतः त्यातली “पाऊस” ही कविता विश्लेषणासकट सादर केली होती. अप्रतिम कविता. प्रेमात पडलेल्या मुलाची अन मुलीची ती गोष्ट आहे. मुलासाठी पाऊस हे रूपक त्यांनी फार छान वापरलंय.

त्यांचीच त्या कवितासंग्रहातली “बेईमान” अशीच एक short but sweet कविता आहे.

“...आता कसा तुला
मी या डोळ्यांत साठवू,
माझी नजर नेसून गेलं
एक बेईमान फुलपाखरू.”

या अशा कविता तर अजिंक्य चंदनशिवेच्या (माझा मावसभाऊ) बंडखोर कविता. “लाज वाटते रामा, तू माझ्या देशात जन्माला आलास...”ही रामावर केलेली,
“आणि मरतानाही “हे राम” म्हणून शंबुकाच्या मारेकर्याचा जयजयकार केलास, अन दलितांना “हरिजन” ही शिवी देऊन गेलास” ही गांधींवरची कविता....या आणि अशा अनेक... फारच बेधडक.... पण कवितेच्या निकषांवर फार उत्तम जमलेल्या कविता...

आणि खरंच, अजिंक्य साठी तर माझा respect! PVG सारखं कॉलेज, Electrical सारखी ब्रांच असूनही त्यानं फर्स्ट इयर झाल्यावर engineering सोडायचा धाडसी निर्णय घेतला. आणि Fergusson ला Political Science ला admission घेतलंही. स्वप्नांना सत्यात उतरवण्याची जिद्द असावी तर अशी.

# # # # #

यावेळी स्नेहलता ताईने एक नवीन संकल्पना मांडली. (स्नेहलता ही श्री ची मावसबहीण. Zeal कॉलेज मध्ये Maths ची Faculty म्हणून काम करते. नुकतीच ती लंडन येथे Leadership Quality वरचा एक २१ दिवसांचा course करून आली.) तर तिच्या संकल्पनेनुसार श्री ने तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या २ चांगल्या Qualities सगळ्यांना सांगायच्या अन  शेवटी मग सगळ्यांनी श्री च्या दोन चांगल्या अन दोन वाईट qualities सांगायच्या असं ठरलं.

त्यानुसार मला माझ्याबद्दल दोन चांगले शब्द ऐकायला मिळाले.

श्री ने सांगितलं की मला कोणत्याही परिस्थितीचं फार लवकर आकलन होतं (म्हणे!), आणि माझ्यातली ऋजुता. आणि दुसरी quality म्हणजे सगळ्यांचं मत नीट ऐकून घेऊन मग कृती करण्याचा स्वभाव. ह्या दोन qualities चांगल्या आहेत. आजकाल स्वतः बद्दल हे एवढं कौतुक फुकटात कुठे ऐकायला मिळतं?

पण कल्पना छान होती. श्री ला एकच वाईट quality बद्दल feedback मिळाला. म्हणजे तू सर्वाना समजेल अश्या भाषेत लिहित जा. त्याचं लेखन हे फार बोजड असतं असं सगळ्यांचं म्हणणं. त्याने त्यावर योग्य तो follow up घेईन असं सांगितलं.

# # # # #

र असा हा वाढदिवस म्हणजे आपल्या जाणीवा आणखी एका वर्षाने समृद्ध करण्याचा दिवस, ही संकल्पना मला तर फारच पटली. रूटीन पद्धतीने फक्त केक, खाणे, आणि टाईमपास गप्पा यासाठी वर्षभरातले इतर ३६४ दिवस आहेतच की. पण वाढदिवसानिमित्त का होईना ,एकमेकांशी "संवाद" साधून एकमेकांच्या जगणं share करणं ही भावनाच किती छान आहे. आणि असा हा खऱ्याखुऱ्या अर्थाने साजरा होणारा श्रीचा "वाढ"दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर माझ्यासाठी तरी एक पर्वणीच असते.

# # # # #

वेळसावची संध्याकाळ

# # # # # ग्रीन टी चा बाजूला ठेवलेला कप कामाच्या नादात थंड झाला आहे हे लक्षात येतं, तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं. संध्याकाळचे सात. म्हणजे बाह...