Monday 31 August 2015

दादांतर्फे एम. टेक. कम्प्लिशनचं गिफ्ट

     
     “पण इंजिनियर झालात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! या घरातील पहिले इंजिनियर झाला आहात त्याबद्दल आपल्याला माझ्यातर्फे ही भेट” असं म्हणून दादांनी एक छोटी डबी अन एक गुलाबांचा बुके माझ्यासमोर धरला. लालबुंद नक्षीदार डबीवर लिहिलं होतं, “पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स” त्यांनी ती डबी उघडली, अन आत सोन्याची अंगठी, अन त्या अंगठीत चमकणारा एक खडा!” माझ्यासाठी हा एक अनपेक्षित धक्का होता. आजोबांकडून हे इतकं मौल्यवान गिफ्ट मिळावं, या योग्यतेचे आपण आहोत का, असा प्रश्न पडला. पण दादांनी एवढ्या प्रेमाने समोर धरलीये म्हटल्यावर मला नाहीही म्हणता येईना. उजव्या हाताची तर्जनी पुढे केली. दादांनी त्यावर अंगठी चढवली. मला खूपच विशेष कुणीतरी झाल्यासारखं वाटलं उगाच.

दादांनी दिलेला गुलाबांचा बुके आणि अंगठी

अंगठी घालताना दादा
     मला दहावी झाल्या-झाल्यानंतरचे दिवस आठवले. दादांनी मला विचारलं होतं, काय व्हायचं आता तुला? मी म्हटलं होतं, इंजिनियर. अर्थात त्यामागं फार मोठी इंजिनियरच होण्याची इच्छा होती, किंवा अगदी लहानपणापासूनचं स्वप्नं, असं काही नव्हतं. दोनच पर्याय समोर होते. डॉक्टर किंवा इंजिनियर. त्यातही इंजिनियरिंग मध्ये लवकर कमावतं होता येईल हाही एक धोपटमार्ग विचार होताच. म्हणून इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेची तयारी मी सुरु केली.

     “अरे बापरे!! हितकाली पुस्तकं... वाचून होतील कारे दोन वर्षात?” जाडजूड पुस्तकांचा ढीग पाहून दादा म्हणाले होते. काकाचं त्यावर उत्तर, “ वाचावंच लागणार आहे त्याला. जर आयआयटी पाहिजे असेल तर इतकं करावंच लागणार आहे” काकांचा माझ्या अभ्यासातला किंवा एकंदरीत शैक्षणिक गोष्टीमधला सहभाग मला नेहेमीच थक्क करून सोडी. अगदी घटक चाचणीचे पेपर असोत, किंवा कसलीही पालक मीटिंग असो. काका अगदी सावलीसारखे माझ्या पाठीशी होते, आणि अजूनही आहेत. हेच एक कारण आहे कि मी इथपर्यंत पोहोचू शकलो. काका नेहेमीच अगदी दीपगृहासारखे माझ्या सोबत आहेत.

# # #

     माझं आणखी एक सगळ्यात मोठं प्रेरणा स्थान म्हणजे बाई. माझी सत्तरीतली आजी. “गृहकृत्यदक्ष” या शब्दाचा अर्थ तिच्याकडे पाहून कळतो.

     बाई. दुध. आलेss. बाई, माझ्या शर्टचं बटन तुटलंय, तेवढं लावून दे ग, वाढा ओ जेवायला, हम्म, आले दोन मिनिटं, बई, भांड्यांचा साबण संपलाय ओ, तेव्हड काडून देताव का? बई, कपड्याचं साबण... का ग, परवा तर दिला दिला होता ना, लगीच कसं संपलं? आई, आज ती माणसं येतील हं नळ बसवायला. बाई, नाश्ता. बाई, तो फोटोंचा अल्बम होता की ग, कुठला रे? अगं ते जुने फोटो? अं, ते दिवानच्या खालचा कप्पा उघड, तिथेच आहे बघ. बाई, नाहीये तिथं. होतं कि रे. थांब मी बघते. हं. हि काय? समोरचं दिसत नाही बघ तुला. बई, ज्वारीचं पीट संपलं कि ओ. आता बया, गिरणी लावायचीच राहिली की. जा रे. मी दळण काढून देते, तेव्हड गिरणीत ठेवून ये. अरे... तुझी कपडे कोणची धुवायची असतील तर दे बरं. ती बाई धुऊन तरी टाकील चट चट. मी काय म्हणते, हे शर्ट इस्त्रीला द्यावेत. देऊ का? हो. पोरी आल्या का शिकवणी वरून? जेवून घ्या ग पोरींनो. आंबा देऊ का कापून? सफरचंद ठेवलय बघ. देऊ का एखादं? आता बया... पाच वाजले कि. थांब, चहाला ठेवते. तू घेतोस ना? का रे घे कि थोडासा. आळस जाईल तेवढाच. आलीस का? खा थोडंस काहीतरी. अगं जेव की. आई... आले आले. अगं ते वेलाला मांडव केला मागं लाकडं रोवून...

     असंख्य अगणित कामं. आणि सगळं करून सवरून दुखून खुपून पुन्हा आनंदी राहणं. सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. तिला पाहून मग आपल्या वयाचा, जाणीवेचा, समज – उमजेचा, छोटेपणा, संकोचपणा जाणवत राहतो.

     सभोवताली माणसं असली, की तिला हुरूप चढतो. अगदी पटापट तिची कामं हातावेगळी होत जातात. जितकी जास्त माणसं, तितकं जास्त सुख. माणसांनी, लेकरा बाळांनी भरलेल्या घरात तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. पण माणसांपैकी कुणीही गावी निघालं, कि तिचा जीव कासावीस होतो. बाई, परवा निघालो ग. परवा? आता बाई. का रे लगेच. तिचा चेहरा थोडासा पडतो. मग ती जाणाऱ्याला वाटे लावायला मग गूळ – शेंग दाण्याच्या पोळ्या, पुरणपोळ्या, असल्या कामात गुंतून जाते. निरोप देताना तर गळ्याखाली गिळलेला हुंदका स्पष्ट दिसतो. अगदी नजरेतून दिसेनासे होईपर्यंत तिचा हात हलत राहतो.

     मग सगळी माणसं, नातवंड जिकडच्या तिकडे गेली किंवा आसपास कुणी नसलं, की मग ती सावकाश विणकाम हातात घेते. लाल, निळ्या, हिरव्या, पांढऱ्या लोकरींचे तागे. रिकाम्या वेळेत अगदी अव्याहत सुरु असलेलं काम. कुणाला शाल, कुणाला मफलर, कुणाला टोपी, कुणाला मोजे, कुणाला स्वेटर, तर कधी टेबल क्लोथ, वगैरे. दुपारनंतर घरात अंगावर येणारं एकटेपण ती त्या दोन सुयांनी परतवून लावत असावी बहुदा. एका समान लयीत वरखाली होणाऱ्या सुया. टक टक टक सुयांवर सुयांचा एका सुरात होणारा आवाज. धागे आपसूक एका सुईवरून दुसऱ्या सुईवर जात राहतात. जादुई धागे. तिच्या माणसांशिवायची पोकळी, ते अवकाश ती त्या धाग्यातून गुंफून नष्ट करत जाते. पानं, फुलं, आकार घेत राहतात. दुपार नंतरच्या एकुटवाण्या जगात तिला त्या लोकरीच्या पाना - फुलांची साथ आहे.

     स्क्रीन लाईफ, जसं कि स्मार्टफोन्स, कॉम्प्यूटर च्या अभावामुळे म्हणा, किंवा आता इतक्या वर्षांची अंगवळणी पडलेली सवय असेल म्हणा, त्यामुळे स्थळ – काळाचं भान हे आमच्यापेक्षा बाई – दादांनाच चांगलं आहे असं म्हणता येईल. साडे आठ वाजता नाश्ता तयार म्हणजे तयार. दुपारी बाराच्या आत भाज्या तयार म्हणजे तयार. रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला. अगदी घड्याळाच्या काट्यांवर चालणारा. आमचं म्हणजे आज उठायला दहा वाजले, तर उद्या सातलाच उठून बसलो असं.
लहानपणीच्या तर कित्येक आठवणी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर शाळा नसतानाही सहा वाजता जाग यायची. नेहेमीची सवय. पण झोपेची तेव्हा वैतागवाडी नसायची. फोन्स, Laptops नसल्यामुळे रात्री नऊ – दहा पर्यंत सगळे चिडीचूप झोपी जायचे. त्यामुळे लवकर जागही यायची. तर उठल्यानंतर बाई सकाळी उठून अंगणात सडा वगैरे घालीत असे, त्यानंतर रांगोळी. त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना ग्लासभर दूध. दूध घेऊन झालं, की बाईचं ठरलेलं वाक्य – “वाघ झाला गड्या!”

     आता बाई आणि मी वेगवेगळ्या शहरांत राहत असून देखील कधी दूध वगैरे घेतलं, की रिकामा कप खाली टेकवताना याची आठवण येतेच – “वाघ झाला गड्या!” अन बाईचा खळखळून हसरा चेहरा.

एका निवांत क्षणी बाई

# # #

Saturday 27 June 2015

गोवळकोंडा - दखनी शिलापर्वत

# # # # #

काळ येतो. जातो.

माणसे आणि त्यांच्या महत्वाकांक्षा बदलत जातात.

सगळं अनिश्चित – अनित्य असूनही घडलेल्या घटना – काही जगलेली आयुष्यं आपसूक जपली जातात.
तसा काळाचा शाप सर्वांसाठीच नित्य. कुणालाही न चुकणारा. शेकडो युद्धे हरून – जिंकून जगावर राज्य मिळवलं  तरी त्यालाही तो शाप लागू.

सिकंदराचे हात त्याच्या कॉफिन खाली लोंबकळत राहतात शेवटी. जगज्जेत्याचेही हात रिकामेच.

# # # # #

तिलांगणातले अजस्र शिळांचे डोंगर म्हणजे एक अद्भुत दृश्य.

नल्लरायि – म्हणजे शब्दशः काळा दगड. ग्रेनाईट. आणि मजा म्हणजे नल्ल – या शब्दाचा तमिळ अर्थ चांगला, मंगल. कदाचित मग काळा रंग आणि मंगल याचं दक्षिणेत काही वेगळं नातं असावं का?

दक्खनच्या पठाराची बुलंदी दाखवून देत या शिळा वर्षानुवर्ष इथेच पडून आहेत. झालं असं की, या शिळा म्हणजे माणसाला त्याच्या निवार्यासाठी भलत्याच आधाराच्या झाल्या. त्यांच्या गुहा – कपारींमधून वस्त्या होत गेल्या. यात अगदी दोनेक हजार वर्षं मागे जाता येईल. अजिंठा – वेरूळ च्या काळापर्यंत.

देवगिरीचे यादव जेव्हा दक्खन च्या पठारावर राज्यकर्ते होते तेव्हाची गोष्ट. सध्याचा तिलंगण चा भाग तेव्हा काकतीय साम्राज्यात येत असे. राणी रुद्रम्मा देवीचं साम्राज्य. ओरुगाल्लू ही त्यांची राजधानी. सध्या हे शहर वरंगल म्हणून ओळखलं जातं. काकतीय साम्राज्याच्या चारही दिशा अभेद्य असाव्यात ही राजा प्रताप रुद्राची इच्छा होती. त्यानुसार पश्चिमेकडचा एक डोंगर निश्चित करण्यात आला. त्यावर पूर्वी गवळी लोक मातीची घरे बांधून राहत असत. गोल्लाकोंडा हे त्या वस्तीचं नाव. तिथे चिरेबंदी भिंत बांधून त्या डोंगराचं एका किल्ल्यात रुपांतर केलं गेलं. गड वसता झाला. इसवी सनाचं सुमारे बारावं शतक. काकतीय साम्राज्याचा सुवर्णकाळ. नंतर लागलेली उतरती कळा अन मग शेवटी अस्त. आणि किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. अगदी तेव्हापासून ह्या अतिप्रचंड शिळा हा बदलता काळ पहात आहेत.

PC - http://www.yadavhistory.com/state_wise_history/andhra_pradesh


# # # # #

     हिरे. दगडी कोळशाच बदलेलं रूप. इतिहासात असं कोणतंच रत्न नसेल की ज्यासाठी इतका भयानक रक्तपात झाला असेल. ब्लड डायमंड. हिर्याची चमचमती भूल म्हणजे जीवाशी खेळ. आंध्रभूमी ही अगदी पहिल्यापासून हिर्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. कोह – इ – नूर, (कोह = पर्वत , नूर - चमक) एक तुकडा सध्या ब्रिटीश क्वीन च्या शिरपेचात आहे, तोही इथलाच. कोल्लूर च्या खाणीतला. आणि बरेच जगप्रसिद्ध हिरे इथलेच.

# # # # #

     कुली कुतुबशाहीचं राज्य हैदराबाद वर होतं तेव्हा खरं गोवलकोंडा किल्ला विशेष करून बांधला गेला. इथली मस्जिद, दिवान – ए – आम, दिवान – ए – खास, अंबरखाना, कोठी हे सगळं त्या काळात बांधलं गेलं. कररचना, प्रशासन आलं. त्यानुसार सरदार नेमले गेले.

PC - www.indialine.com

PC - www.historicaltimeofindia.com

     त्यातलाच एक अक्कण्णा मादण्णा, ज्याने करवसुली करून ती गरीबांमध्ये वाटून टाकली असे म्हणतात, त्याला या कृत्याबद्दल कुतुबशाहीने चौदा वर्ष कैदेची सजा सुनावली होती. त्याची कोठडी ही तिथेच आहे. त्याने आतल्या भिंतींवर दगडाच्या सहाय्याने कोरून मूर्ती काढल्या आहेत. काळाच्या ओघात त्यावर शेंदूर फासून त्यांची पूजा करणं आलंच.
PC - www.thrillophilia.com

 दरबारात उभा राहून डोंगराखालच्या दृश्यावर नजर टाकली की, एकीकडे राणीवसा दिसतो. राण्यांचे महाल. उजाड झालेल्या, पडल्या झडल्या भिंतीतून आजही कुतुबशाही चं वैभव दिसून येतं. बांधकामा वरचा मुघल प्रभाव तर आहेच, पण ध्वनिशास्त्राचा त्याचा अभ्यास पाहून थक्क व्हायला होतं. न्यायनिवाडा जिथे व्हायचा तिथे आरोपीला बरोबर एका घुमटाकार छताखाली उभा केला जाई. आणि अगदी त्याचा अंगरखा जरी हलला, तरी त्याचा आवाज अगदी लाऊडस्पीकर मधून आल्यासारखा यायचा. म्हणजे तो अजूनही येतो. वाटाडे हा आवाज आपल्या सदरऱ्यावर हि काढून दाखवतात. ही सावधानता म्हणून उपयोगाला येण्यासारखी युक्ती. जर आरोपीने सजा ऐकून बचावासाठी तालावर वगैरे काढली, तरी त्याचा आवाज व्हावा म्हणून.

PC - www.mithunonthe.net

      ध्वनीचा अजून एक आविष्कार म्हणजे प्रवेश द्वाराच्या घुमटा खाली थांबून जर कोणी टाळी वाजवली तर ती अगदी डोंगरावर असणाऱ्या दिवान ए आम पर्यंत स्पष्ट ऐकू जाते. सगळी घुमटाच्या पैलूदार रचनेची करामत. आवाज त्यातल्या रकान्यांमध्ये घुमत राहून मोठा होत जातो. ( सायन्स वाल्यांसाठी = Constructive Interference happens when two coherent sound waves are superimposed) हे सगळं ज्ञान इतकं explicit नसलं  तरी implicitly त्यांनी जाणून घेऊन अशा रचना तयार केल्या होत्या हे निश्चित.
PC - www.tripadvisor.com


# # # # #


कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...