“जित्यापणी पाणी पाजायला कुणाला फुरसत नसती. सगळे आपापल्या परपंच्यात
असत्यात! मेल्यालं माणूस कधी पाणी प्येतय व्हय? आन ते काय! हाताला येईल तो फटकूर
कुणी कधी धुतल्याला असतोय का नसतोय त्यात पाणी पिळायला दहा जणांचे हात! अर्ध पाणी
तोंडात न अर्ध भाईर! अशा तर्हा, कशाचं काय आलंय? मेलं म्हजी गेलं.”
या ओळी वाचल्या अन तासभर कानात घुमत राहिल्या.
जिनं हे म्हटलं तिलाही शेवटी त्याच पद्धतीनं पाणी पाजण्यात आलं. मरण.
प्रत्येकासाठी अटळ.
# # # # #
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एका “आई” चं स्थान ती नसते तेव्हाच
कळणारं. एरवी सगळे आपापल्या प्रपंचात गढून गेलेले असतात. नरेंद्र जाधव म्हणतात
त्याप्रमाणे आई ही आपल्या जगण्याच्या रेल्वेचं जणू “अनसीन इंजिन” असतं. रावसाहेब
ससाणे यांनी त्यांच्या “बोलावणं” या पुस्तकाच्या रूपाने त्यांच्या आईचं जाणं अन
त्यायोगे आईचं संपूर्ण आयुष्य उलगडून दाखवलंय.
माझ्या नगरच्या आत्याचे मिस्टर डॉ. अनिल ससाणे, रावसाहेब ससाणे हे
त्यांचे भाऊ. त्यांच्या आई भीमाबाई यांच्या सहवासात मला कधी राहण्याचा प्रसंग आला
नसला तरी, तरी त्या सर्वांनाच फार जीव लावायच्या असं मी बाई, बाबा, आणि माझ्या सगळ्याच
माणसांकडून ऐकलंय. आणि आता या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं आणि त्यांनी
जगलेल्या आयुष्याचं पर्व अगदी जसंच्या तसं वाचायला मिळालं.
गावाकडच्या चालीरीती, महार म्हणून भाकरीच्या उद्देशाने करावी लागलेली
गावकीची कामे, बाबासाहेबांच्या शिकवणुकीतून वाहू लागलेले परिवर्तनाचे वारे,
त्यांनी गावकीची कामे नाकारण्याचा दिलेला संदेश, तरीही कुटुंब चालवता यावे म्हणून
म्हातार्याला(लेखकाचे आजोबा) करावी लागलेली गावकी, त्यातून उद्भवलेले कौटुंबिक
वाद, वाळीत टाकलं जाणं, तरीही म्हातार्याने खंबीरपणे त्या सगळ्यांशी लढून पुढे
नेलेलं कुटुंब... वाचता वाचता अनेकदा रडूही येतं.
तर काही प्रसंग मजेशीर. उदाहरणार्थ सौन्दराबाईचं अंगात येणं, तिचं
भूतं पळवून लावणं, यासारखे अनेक.
एक चांगलं पुस्तक.
# # # # #
No comments:
Post a Comment