Monday, 31 August 2015

दादांतर्फे एम. टेक. कम्प्लिशनचं गिफ्ट

     
     “पण इंजिनियर झालात त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन! या घरातील पहिले इंजिनियर झाला आहात त्याबद्दल आपल्याला माझ्यातर्फे ही भेट” असं म्हणून दादांनी एक छोटी डबी अन एक गुलाबांचा बुके माझ्यासमोर धरला. लालबुंद नक्षीदार डबीवर लिहिलं होतं, “पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स” त्यांनी ती डबी उघडली, अन आत सोन्याची अंगठी, अन त्या अंगठीत चमकणारा एक खडा!” माझ्यासाठी हा एक अनपेक्षित धक्का होता. आजोबांकडून हे इतकं मौल्यवान गिफ्ट मिळावं, या योग्यतेचे आपण आहोत का, असा प्रश्न पडला. पण दादांनी एवढ्या प्रेमाने समोर धरलीये म्हटल्यावर मला नाहीही म्हणता येईना. उजव्या हाताची तर्जनी पुढे केली. दादांनी त्यावर अंगठी चढवली. मला खूपच विशेष कुणीतरी झाल्यासारखं वाटलं उगाच.

दादांनी दिलेला गुलाबांचा बुके आणि अंगठी

अंगठी घालताना दादा
     मला दहावी झाल्या-झाल्यानंतरचे दिवस आठवले. दादांनी मला विचारलं होतं, काय व्हायचं आता तुला? मी म्हटलं होतं, इंजिनियर. अर्थात त्यामागं फार मोठी इंजिनियरच होण्याची इच्छा होती, किंवा अगदी लहानपणापासूनचं स्वप्नं, असं काही नव्हतं. दोनच पर्याय समोर होते. डॉक्टर किंवा इंजिनियर. त्यातही इंजिनियरिंग मध्ये लवकर कमावतं होता येईल हाही एक धोपटमार्ग विचार होताच. म्हणून इंजिनियरिंग प्रवेश परीक्षेची तयारी मी सुरु केली.

     “अरे बापरे!! हितकाली पुस्तकं... वाचून होतील कारे दोन वर्षात?” जाडजूड पुस्तकांचा ढीग पाहून दादा म्हणाले होते. काकाचं त्यावर उत्तर, “ वाचावंच लागणार आहे त्याला. जर आयआयटी पाहिजे असेल तर इतकं करावंच लागणार आहे” काकांचा माझ्या अभ्यासातला किंवा एकंदरीत शैक्षणिक गोष्टीमधला सहभाग मला नेहेमीच थक्क करून सोडी. अगदी घटक चाचणीचे पेपर असोत, किंवा कसलीही पालक मीटिंग असो. काका अगदी सावलीसारखे माझ्या पाठीशी होते, आणि अजूनही आहेत. हेच एक कारण आहे कि मी इथपर्यंत पोहोचू शकलो. काका नेहेमीच अगदी दीपगृहासारखे माझ्या सोबत आहेत.

# # #

     माझं आणखी एक सगळ्यात मोठं प्रेरणा स्थान म्हणजे बाई. माझी सत्तरीतली आजी. “गृहकृत्यदक्ष” या शब्दाचा अर्थ तिच्याकडे पाहून कळतो.

     बाई. दुध. आलेss. बाई, माझ्या शर्टचं बटन तुटलंय, तेवढं लावून दे ग, वाढा ओ जेवायला, हम्म, आले दोन मिनिटं, बई, भांड्यांचा साबण संपलाय ओ, तेव्हड काडून देताव का? बई, कपड्याचं साबण... का ग, परवा तर दिला दिला होता ना, लगीच कसं संपलं? आई, आज ती माणसं येतील हं नळ बसवायला. बाई, नाश्ता. बाई, तो फोटोंचा अल्बम होता की ग, कुठला रे? अगं ते जुने फोटो? अं, ते दिवानच्या खालचा कप्पा उघड, तिथेच आहे बघ. बाई, नाहीये तिथं. होतं कि रे. थांब मी बघते. हं. हि काय? समोरचं दिसत नाही बघ तुला. बई, ज्वारीचं पीट संपलं कि ओ. आता बया, गिरणी लावायचीच राहिली की. जा रे. मी दळण काढून देते, तेव्हड गिरणीत ठेवून ये. अरे... तुझी कपडे कोणची धुवायची असतील तर दे बरं. ती बाई धुऊन तरी टाकील चट चट. मी काय म्हणते, हे शर्ट इस्त्रीला द्यावेत. देऊ का? हो. पोरी आल्या का शिकवणी वरून? जेवून घ्या ग पोरींनो. आंबा देऊ का कापून? सफरचंद ठेवलय बघ. देऊ का एखादं? आता बया... पाच वाजले कि. थांब, चहाला ठेवते. तू घेतोस ना? का रे घे कि थोडासा. आळस जाईल तेवढाच. आलीस का? खा थोडंस काहीतरी. अगं जेव की. आई... आले आले. अगं ते वेलाला मांडव केला मागं लाकडं रोवून...

     असंख्य अगणित कामं. आणि सगळं करून सवरून दुखून खुपून पुन्हा आनंदी राहणं. सगळ्यांना आनंदी ठेवण्यासाठी. तिला पाहून मग आपल्या वयाचा, जाणीवेचा, समज – उमजेचा, छोटेपणा, संकोचपणा जाणवत राहतो.

     सभोवताली माणसं असली, की तिला हुरूप चढतो. अगदी पटापट तिची कामं हातावेगळी होत जातात. जितकी जास्त माणसं, तितकं जास्त सुख. माणसांनी, लेकरा बाळांनी भरलेल्या घरात तिला काय करू आणि काय नको असं होऊन जातं. पण माणसांपैकी कुणीही गावी निघालं, कि तिचा जीव कासावीस होतो. बाई, परवा निघालो ग. परवा? आता बाई. का रे लगेच. तिचा चेहरा थोडासा पडतो. मग ती जाणाऱ्याला वाटे लावायला मग गूळ – शेंग दाण्याच्या पोळ्या, पुरणपोळ्या, असल्या कामात गुंतून जाते. निरोप देताना तर गळ्याखाली गिळलेला हुंदका स्पष्ट दिसतो. अगदी नजरेतून दिसेनासे होईपर्यंत तिचा हात हलत राहतो.

     मग सगळी माणसं, नातवंड जिकडच्या तिकडे गेली किंवा आसपास कुणी नसलं, की मग ती सावकाश विणकाम हातात घेते. लाल, निळ्या, हिरव्या, पांढऱ्या लोकरींचे तागे. रिकाम्या वेळेत अगदी अव्याहत सुरु असलेलं काम. कुणाला शाल, कुणाला मफलर, कुणाला टोपी, कुणाला मोजे, कुणाला स्वेटर, तर कधी टेबल क्लोथ, वगैरे. दुपारनंतर घरात अंगावर येणारं एकटेपण ती त्या दोन सुयांनी परतवून लावत असावी बहुदा. एका समान लयीत वरखाली होणाऱ्या सुया. टक टक टक सुयांवर सुयांचा एका सुरात होणारा आवाज. धागे आपसूक एका सुईवरून दुसऱ्या सुईवर जात राहतात. जादुई धागे. तिच्या माणसांशिवायची पोकळी, ते अवकाश ती त्या धाग्यातून गुंफून नष्ट करत जाते. पानं, फुलं, आकार घेत राहतात. दुपार नंतरच्या एकुटवाण्या जगात तिला त्या लोकरीच्या पाना - फुलांची साथ आहे.

     स्क्रीन लाईफ, जसं कि स्मार्टफोन्स, कॉम्प्यूटर च्या अभावामुळे म्हणा, किंवा आता इतक्या वर्षांची अंगवळणी पडलेली सवय असेल म्हणा, त्यामुळे स्थळ – काळाचं भान हे आमच्यापेक्षा बाई – दादांनाच चांगलं आहे असं म्हणता येईल. साडे आठ वाजता नाश्ता तयार म्हणजे तयार. दुपारी बाराच्या आत भाज्या तयार म्हणजे तयार. रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला. अगदी घड्याळाच्या काट्यांवर चालणारा. आमचं म्हणजे आज उठायला दहा वाजले, तर उद्या सातलाच उठून बसलो असं.
लहानपणीच्या तर कित्येक आठवणी. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तर शाळा नसतानाही सहा वाजता जाग यायची. नेहेमीची सवय. पण झोपेची तेव्हा वैतागवाडी नसायची. फोन्स, Laptops नसल्यामुळे रात्री नऊ – दहा पर्यंत सगळे चिडीचूप झोपी जायचे. त्यामुळे लवकर जागही यायची. तर उठल्यानंतर बाई सकाळी उठून अंगणात सडा वगैरे घालीत असे, त्यानंतर रांगोळी. त्यानंतर मग आम्हाला सगळ्यांना ग्लासभर दूध. दूध घेऊन झालं, की बाईचं ठरलेलं वाक्य – “वाघ झाला गड्या!”

     आता बाई आणि मी वेगवेगळ्या शहरांत राहत असून देखील कधी दूध वगैरे घेतलं, की रिकामा कप खाली टेकवताना याची आठवण येतेच – “वाघ झाला गड्या!” अन बाईचा खळखळून हसरा चेहरा.

एका निवांत क्षणी बाई

# # #

Saturday, 27 June 2015

गोवळकोंडा - दखनी शिलापर्वत

# # # # #

काळ येतो. जातो.

माणसे आणि त्यांच्या महत्वाकांक्षा बदलत जातात.

सगळं अनिश्चित – अनित्य असूनही घडलेल्या घटना – काही जगलेली आयुष्यं आपसूक जपली जातात.
तसा काळाचा शाप सर्वांसाठीच नित्य. कुणालाही न चुकणारा. शेकडो युद्धे हरून – जिंकून जगावर राज्य मिळवलं  तरी त्यालाही तो शाप लागू.

सिकंदराचे हात त्याच्या कॉफिन खाली लोंबकळत राहतात शेवटी. जगज्जेत्याचेही हात रिकामेच.

# # # # #

तिलांगणातले अजस्र शिळांचे डोंगर म्हणजे एक अद्भुत दृश्य.

नल्लरायि – म्हणजे शब्दशः काळा दगड. ग्रेनाईट. आणि मजा म्हणजे नल्ल – या शब्दाचा तमिळ अर्थ चांगला, मंगल. कदाचित मग काळा रंग आणि मंगल याचं दक्षिणेत काही वेगळं नातं असावं का?

दक्खनच्या पठाराची बुलंदी दाखवून देत या शिळा वर्षानुवर्ष इथेच पडून आहेत. झालं असं की, या शिळा म्हणजे माणसाला त्याच्या निवार्यासाठी भलत्याच आधाराच्या झाल्या. त्यांच्या गुहा – कपारींमधून वस्त्या होत गेल्या. यात अगदी दोनेक हजार वर्षं मागे जाता येईल. अजिंठा – वेरूळ च्या काळापर्यंत.

देवगिरीचे यादव जेव्हा दक्खन च्या पठारावर राज्यकर्ते होते तेव्हाची गोष्ट. सध्याचा तिलंगण चा भाग तेव्हा काकतीय साम्राज्यात येत असे. राणी रुद्रम्मा देवीचं साम्राज्य. ओरुगाल्लू ही त्यांची राजधानी. सध्या हे शहर वरंगल म्हणून ओळखलं जातं. काकतीय साम्राज्याच्या चारही दिशा अभेद्य असाव्यात ही राजा प्रताप रुद्राची इच्छा होती. त्यानुसार पश्चिमेकडचा एक डोंगर निश्चित करण्यात आला. त्यावर पूर्वी गवळी लोक मातीची घरे बांधून राहत असत. गोल्लाकोंडा हे त्या वस्तीचं नाव. तिथे चिरेबंदी भिंत बांधून त्या डोंगराचं एका किल्ल्यात रुपांतर केलं गेलं. गड वसता झाला. इसवी सनाचं सुमारे बारावं शतक. काकतीय साम्राज्याचा सुवर्णकाळ. नंतर लागलेली उतरती कळा अन मग शेवटी अस्त. आणि किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. अगदी तेव्हापासून ह्या अतिप्रचंड शिळा हा बदलता काळ पहात आहेत.

PC - http://www.yadavhistory.com/state_wise_history/andhra_pradesh


# # # # #

     हिरे. दगडी कोळशाच बदलेलं रूप. इतिहासात असं कोणतंच रत्न नसेल की ज्यासाठी इतका भयानक रक्तपात झाला असेल. ब्लड डायमंड. हिर्याची चमचमती भूल म्हणजे जीवाशी खेळ. आंध्रभूमी ही अगदी पहिल्यापासून हिर्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. कोह – इ – नूर, (कोह = पर्वत , नूर - चमक) एक तुकडा सध्या ब्रिटीश क्वीन च्या शिरपेचात आहे, तोही इथलाच. कोल्लूर च्या खाणीतला. आणि बरेच जगप्रसिद्ध हिरे इथलेच.

# # # # #

     कुली कुतुबशाहीचं राज्य हैदराबाद वर होतं तेव्हा खरं गोवलकोंडा किल्ला विशेष करून बांधला गेला. इथली मस्जिद, दिवान – ए – आम, दिवान – ए – खास, अंबरखाना, कोठी हे सगळं त्या काळात बांधलं गेलं. कररचना, प्रशासन आलं. त्यानुसार सरदार नेमले गेले.

PC - www.indialine.com

PC - www.historicaltimeofindia.com

     त्यातलाच एक अक्कण्णा मादण्णा, ज्याने करवसुली करून ती गरीबांमध्ये वाटून टाकली असे म्हणतात, त्याला या कृत्याबद्दल कुतुबशाहीने चौदा वर्ष कैदेची सजा सुनावली होती. त्याची कोठडी ही तिथेच आहे. त्याने आतल्या भिंतींवर दगडाच्या सहाय्याने कोरून मूर्ती काढल्या आहेत. काळाच्या ओघात त्यावर शेंदूर फासून त्यांची पूजा करणं आलंच.
PC - www.thrillophilia.com

 दरबारात उभा राहून डोंगराखालच्या दृश्यावर नजर टाकली की, एकीकडे राणीवसा दिसतो. राण्यांचे महाल. उजाड झालेल्या, पडल्या झडल्या भिंतीतून आजही कुतुबशाही चं वैभव दिसून येतं. बांधकामा वरचा मुघल प्रभाव तर आहेच, पण ध्वनिशास्त्राचा त्याचा अभ्यास पाहून थक्क व्हायला होतं. न्यायनिवाडा जिथे व्हायचा तिथे आरोपीला बरोबर एका घुमटाकार छताखाली उभा केला जाई. आणि अगदी त्याचा अंगरखा जरी हलला, तरी त्याचा आवाज अगदी लाऊडस्पीकर मधून आल्यासारखा यायचा. म्हणजे तो अजूनही येतो. वाटाडे हा आवाज आपल्या सदरऱ्यावर हि काढून दाखवतात. ही सावधानता म्हणून उपयोगाला येण्यासारखी युक्ती. जर आरोपीने सजा ऐकून बचावासाठी तालावर वगैरे काढली, तरी त्याचा आवाज व्हावा म्हणून.

PC - www.mithunonthe.net

      ध्वनीचा अजून एक आविष्कार म्हणजे प्रवेश द्वाराच्या घुमटा खाली थांबून जर कोणी टाळी वाजवली तर ती अगदी डोंगरावर असणाऱ्या दिवान ए आम पर्यंत स्पष्ट ऐकू जाते. सगळी घुमटाच्या पैलूदार रचनेची करामत. आवाज त्यातल्या रकान्यांमध्ये घुमत राहून मोठा होत जातो. ( सायन्स वाल्यांसाठी = Constructive Interference happens when two coherent sound waves are superimposed) हे सगळं ज्ञान इतकं explicit नसलं  तरी implicitly त्यांनी जाणून घेऊन अशा रचना तयार केल्या होत्या हे निश्चित.
PC - www.tripadvisor.com


# # # # #


Sunday, 23 November 2014

डॉ. प्रकाश बाबा आमटे...



     

   
    

      मास्लोव ने सर्वप्रथम मानवी गरजांची यादी तयार केली. त्यात हवा, पाणी, आणि अन्न या गरजा अगदी प्राथमिक आहेत. त्यानंतर येते ती सुरक्षितता. सुरक्षिततेची गरज भागली, कि मग माणसाला सामाजिक आयुष्याची गरज असते. त्यानंतर स्वाभिमान, त्यानंतर स्व – निश्चितता. आणि सर्वात शेवटी स्पिरिचुअल, म्हणजे आत्मिक ज्ञान.

    सामान्य म्हणजे तुमच्या आमच्या सारखे लोक, पहिल्या तीन पातळ्यांवरच जगणारे. काही कळत तर काही नकळत. आणि कळून तरी काय उपयोग? अगदी प्रत्येकाचं अर्धं आयुष्य पहिल्या तीन पातळ्यांवरच संपून जाणारं.

    अगदी लहानपणापासूनचा प्रश्न. मोठं झाल्यावर कोण व्हायचं तुला? अर्थात डॉक्टर, इंजिनियर आणि हल्ली हल्ली एरोनोटिकल इंजिनियर, कार्डीओलोजीस्ट, एम्बेडेड सिस्टमस स्पेशालीस्ट... 

     स्वप्नही अगदी कॉम्प्लेक्स.

     ही माझी पिढी.

     आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स स्वप्नांचं फ्युचर काय? हवा, अन्न, पाणी, निवारा आणि सुरक्षितता. मास्लोव ने दर्शवलेल्या -

     पहिल्या – तीन - पातळ्या. एक माणूस म्हणून आपल्याला त्याच्या वरही पोहोचता येतं याचा विचार आजही जरासा अप्रचलित.

     आणि हे सगळं ज्यांना कळतंय (अगदी माझ्यासकट), त्यांचा त्यावर एक चतुर शेरा. सिस्टमच अशी आहे तर आपण तरी काय करणार ना?

# # # # #

     डॉ. प्रकाश बाबा आमटे.

     वडिलांनी पाहिलेलं स्वप्न स्वतःच आयुष्यं बनवून ते जगणारी मुलं असू शकतात कुठे? त्यासाठी आपलं वैयक्तिक आयुष्य पणाला लागलं तरी? एका व्यापक अर्थाने चांगल्या भविष्यकाळासाठी स्वतःच सुखासीन भविष्य बाजूला ठेवू शकतं कोणी? व्यक्तिगत स्थैर्य शोधण्याच्या अनादी मानवी इच्छेला कुणी इतकं रीप्रेस करू शकतं?

     जेव्हा थंडीने काकडणारं उघडं नागडं पोर पाहून स्वतःच्या कपडे घालण्याची लाज वाटायला लागते तेव्हा मास्लोव ने सांगितलेल्या गरजांच्या तक्त्यात आपण सर्वोच्च पातळीवर राहून आपण शोधत असतो. शोधत असतो मानवी जीवनाचा अर्थ आणि त्याच्या संदर्भात आपली भूमिका. सेल्फ क्रायसिस म्हणजे शेवटी काय?

     शेवटी मनातल्या अगणित सुट्या दोऱ्यांची एकत्र गाठ मारणारा हा सिनेमा. माणूस म्हणून आपली ओळख काय, जगण्यासाठी लागणारं धैर्य कसं मिळवावं, आणि संपूर्ण समाजाच्या तुलनेत आपलं स्थान काय हे समजणं म्हणजे मोठं होणं.

     सफरचंद कधी डोक्यावर पडतंय याची वाट पाहणारी माझी पिढी. आपापल्या करियर मध्ये एक फार चांगलं काहीतरी होणार आहे अशी आशा मनात बाळगून असलेली. पर्सिवरन्स ठेवला तर सगळं काही शक्य आहे, नाही का?

# # # # #



Sunday, 31 August 2014

चांदवा




# # # # #

खरंच. पावसाचा आवाज कागदावर कसा लिहायचा?

     तरीही धो धो धो पडणारा पाउस कानात साठला की मग तो मनातून वाहायला लागतो. मनाचे हजारो कप्पे. दरवेळी नवीन दार उघडं आहेच. अजून माझंच असून मलाही त्यांची पुरती मोजदाद नाही. कधी कोणती खोली उघडेल आणि पडद्यामागून पडदे बाजूला सरत काय समोर येईल याचा अंदाज कुणी कसा लावावा? नक्कीच मनाचही काही सनातन संचित आपल्या पूर्वजांकडून आपल्यात उतरत असलं पाहिजे. काही अमूर्त आठवणी... काळवेळेपलीकडच्या. काही प्रसंग आणि कधी कधी काही व्यक्तीही.

     सुरुवातीच्या अगदी अपरिचित व्यक्ती प्रत्येक भेटीनंतर वेगळ्या वेगळ्या वाटत गेल्या. परिस्थितीनुसार त्यांच्या चेहऱ्याला अगणित संदर्भ. पुस्तक वाचता वाचता कंटाळून मध्येच एखादा बुकमार्क टाकून पुस्तक ठेवून द्यावं. पुढच्या वेळी निराळंच पान उघडून पुन्हा नवा बुकमार्क. प्रत्येकच चेहेरा असा बुकमार्क ने भरलेलाय. प्रत्येकाचा वेगळा संदर्भ... कुणाकडून काय घेणारेस अन किती? बघ ते. पुन्हा एका चेहऱ्यावर दिलासा देणारं स्मित उमटलं अन त्यापाठोपाठ कित्तीतरी नवीन कोडी... क्या ब्बात है जनाब.

# # # # #

     दुपारच्या जेवणानंतर आलेली झिंग उतरवायला चहाचा डोस उपयोगी असतो. त्यातून इथले इराणी चहावाले चहा बनवण्यात मातब्बर. रस्त्यातन चालता चालता नुसत्या वासाने चहाची तलब झाली नाही असं शक्य नाही. एकीकडे मलईदार दूध खळाखळा उकळत असताना दुसरीकडे चहाचं “डिकाशन” (Decoction) एका तोटी वाल्या टाकीत ओतलं जातंय... चाय ची ऑर्डर दिल्या दिल्या पळीने दूध आणि वरची थोडी मलई कपात आणि मग त्यावर “डिकाशन”. बाजूला वरखाली करून मिसळायला दुसरा कप. आणि असा चहा दोन मिनिटात हजर. पहिल्याच “सिप” मध्ये ताजेतवाने.

     तमातून ज्योतीकडे नेणारं कलियुगातल अमृत काय असेल तर हे.

# # # # #

Monday, 9 December 2013

मन मनास...

दिवाळीचे उजळलेले दिवस परत जाताना उन्हं कलती करून जातात.

     सकाळच्या नव्या हवेत साचलेलं मऊशार गडद धुकं. लोण्याप्रमाणं धुक्यात वितळत जाणारं ऊन. चालता चालता थबकून मी तळ्याच्या काठी उभा राहतो. झाडा झुडूपांशी सलगी करत विस्तीर्ण पसरलेलं तळं. तळ्याच्या त्या काठाला मला लांबवर रस्ता दिसतो. ह्या असल्या थंडीतही रस्ता जगण्याचा ओघ वाहून नेतोच आहे. मी सावकाश नजर खाली वळवतो. तळ्यात अस्थिर असं माझं प्रतिबिंब. पहाटवाऱ्यामुळे ते हलतंय की आतली अस्थिरता तळ्याच्याही नजरेतून सुटली नाही कोण जाणे?... तसल्या दाठूरत्या थंडीतही माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटलं. प्रतिबिंब मला पाहून विचारतं, “कोण आहेस तू? तुला काय हवंय?”

     मी उलट त्यालाच विचारलं, “कुणाच्या सापेक्ष मी कोण आहे म्हणून सांगू?” ते नुसतंच हसलं. तेही बहुधा माझ्याच जातकुळीतलं असावं. कुणीसं लिहून ठेवलंय, तुम्हीही जगाचाच एक भाग आहात, निर्जीवांपेक्षा तुमच्यात फक्तं एकच गोष्ट वेगळी आहे, तुमच्यात जीव आहे. बाकी तुम्हीही अणुरेणूंचा एक पुंजकाच. त्यांच्यासारखे. म्हणूनच कदाचित त्यांनाही दुःखाची जाण असेलच की. म्हणूनच दुःखाने पोळलेल्या अशाच एखाद्या हतबल जीवाने अथांगाकडे कधीकाळी याचना केली असेल... “मा कश्चित दुःखमाप्नुयात...”

     सूर्य जसजसा आकाशात वर आला, तसतसं हळूहळू धुकं विरून गेलं, तळ्याचा सभोवार लख्ख झाला. खरंच, जग उजळायचं असेल, तर दूरवर एखाद्या सूर्याला जबाबदारीनं रात्रंदिवस जळावंच लागतं. त्याचं कोणाला महत्त्व नसेलही, पण एखादा दिवस तो उगवलाच नाही तर? भयंकर कल्पना. मी मागे फिरलो. झाडांखालच्या मळलेल्या पाऊलवाटांवर चालताना झाडांतून पाझरणारे नाजूक कवडसे. पाचोळ्यात माझी पावलं वाजली, तसं बाजूच्या झाडावरून फडफड करत शेकडो बगळे आकाशात उंचच उंच उडाले, सुंदर दृश्य पाहून मी समोर नजर वळवली तर समोरचं झाड निष्पर्ण. अगदी एकाही फांदीला एकही पान शिल्लक नाही. दुर्दैव. मी म्हणालो. पण ते म्हणालं, “माझ्या डोळ्यांत वसंताची स्वप्नं आहेत.”

     मागे फिरून एकदा या सगळ्या दृश्यावर नजर टाकली.

     “पितात सारे गोड हिवाळा...”

Friday, 18 October 2013

खा खा

# # # # #


     दिवसभराच्या कामानंतर चेहेऱ्यावर पसरलेला मख्ख थकवा घेऊन मी नवीन बुटाच्या आत दुखणाऱ्या पायाकडं साफ दुर्लक्ष करत डी. आर. डी. ओ. चौकात बसची वाट पाहत असतो. कामाचा ताण घालवण्यासाठी कानात अखंड वाजणारे शंकर महादेवन, सोना महापात्रा, श्रेया घोषाल...

     नेहेमीप्रमाणे बसचा रश अवर. चुकूनमाकून थांब्याला बस लागलीच तर जणू बालापूरला चौरस्त्याला जाणारी ती जगातली शेवटची बस असल्याप्रमाणे लोकांची गर्दी. शिवाय एवढ्या दिव्यातून बसमध्ये जागा मिळालीच, आणि एखाद्या म्हातारबुवांनी वगैरे जागा मागितलीच, तर “ ओके अंकल, कूरचोअंदी” (म्हणजे बसा; तेलुगु) म्हणण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एखाद्या unfortunate दिवशी मग शेअर ऑटोनेच जायचं, असं माझं आणि शाहीदचं ठरतं.

     “अबे रोक उस ऑटोको...” – असं मला म्हणून “आपेंडी आपेंडी” (थांबवा; तेलुगु) असं स्वतःच करत कपूर ती गच्च भरलेली केविलवाणी ऑटो थांबवायचा “ऑटोकाट” प्रयत्न करतो. अशा दोन तीन भरगच्च ऑटो आणि मग सरतेशेवटी खास आमच्यासाठी आली असावी अशी एखादी रिकामी शेअर ऑटो.

     अभिषेक कपूर. खाण्याचे पदार्थ शोधणाऱ्याला जर नोबेल मिळत असतं तर यंदाचं नोबेल त्याच्या “बन–बोंडा” या शोधासाठी त्याला नक्की मिळालं असतं.
www.blendwithspices.com
     बन–बोंडा म्हणजे अभिषेक कपूर या माझ्या उत्तर भारतीय मित्राने जमवून आणलेलं मराठमोळ्या वडा–पावचं तिलंगणातलं रूप. चौघात मिळून अर्धा डझन बनपाव घेतले आणि तितकेच बोंडे (बोंडे? – अनेकवचनासाठी माफी) घेतले की मग संध्याकाळी भातासोबत कसली आंबट-चिंबट करी खायला मिळेल याची चिंता करायची जास्त आवश्यकता नसते. आंबट चव म्हणजे तेलुगु लोकांचा जीव की प्राण. अगदी चटण्यांपासून भाज्यांपर्यंत सगळं आंबट ढाण!

     त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे चिकन बिर्याणी. सिकंदराबाद स्टेशन च्या बाहेर अल्फा म्हणून एक फेमस बिर्याणी चं हॉटेल आहे. एकदा सिकंदराबाद ला गेलो तेव्हा आणि परत निघताना अश्या दोन्ही वेळेस जायला मिळालं. चिकन बिर्याणी तर टेस्टी होतीच होती पण व्हेज बिर्याणीही त्याचा तोडीस तोड!

# # # # #

     रंगल च्या चौरस्त्याला गेलं, कि तिथे कोपर्यावर एक अल्टीमेट फास्ट फूड ची टपरी आहे. पहिल्यांदा जेव्हा शाहीद, अभिषेक, दीपक आणि मी मिळून तिकडे गेलो तेव्हा बोंडा खाल्ला होता. आतापर्यंत माझी आणि बोन्ड्याची ओळख पुण्यात मिळणाऱ्या “आलू बोन्ड्यापर्यंत” मर्यादित. पण इथला बोंडा हा तांदळाच्या आंबवलेल्या पिठापासून तयार केलेला. भुकेच्या तावात तिसरी प्लेट संपवताना आम्ही चौघेही या डीशच्या प्रेमात पडलो. शिवाय एवढं खाऊनही मी शेवटी निर्लज्जपणे मसाला डोसा मागवला. उत्तरेकडच्या मसाला डोशाच्या तोंडात मारेल इतकी सुंदर टेस्ट. नुसता मसाला खाऊनच हायसं वाटलं. खरं डोशात भरायच्या सुक्या बटाट्याच्या भाजीला “मसाला” का म्हणायचं हा प्रश्न असला, तरी हा मसाला तयार करण्यात इकडचे लोक माहीर.

www.sree-srecipes.blogspot.com



# # # # #

वेळसावची संध्याकाळ

# # # # # ग्रीन टी चा बाजूला ठेवलेला कप कामाच्या नादात थंड झाला आहे हे लक्षात येतं, तेव्हा घड्याळाकडे लक्ष जातं. संध्याकाळचे सात. म्हणजे बाह...