Tuesday 20 June 2023

कोक-ओ-वां

# # #

कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच्याशिवाय जगू शकत नाहीत. त्यामुळे कोक-ओ-वां मध्ये वाईन, चिकन, बटर यांचा संगम झालेला पाहायला मिळतो. मी शिकलेल्या फ्रेंच रेसिपी मधली ही पहिली. कोक-ओ-वां करण्याच्या अनेक कृतींपैकी ही एक माझा बेलफोर्टमधला जुना घरमालक एरिक ने मला शिकवली आहे. व्यक्ती आणि प्रदेश यांनुसार ही रेसिपी बदलते. असं असलं, तरी मूळ घटक सारखे असल्याने त्याची एक विशिष्ट चव असते. तर रेसिपी खालील प्रमाणे:

साहित्य (दोन माणसांसाठी):

मॅरिनेड साठी साहित्य:
चिकन        : :२ लेग संपूर्ण आणि १ ब्रेस्ट चे मध्यम तुकडे
रेड वाईन      : ७५० मिली (शक्यतो कॅबर्ने सॉविन्यो (Cabernet Sauvignon) किंवा पिनो नोआ (Pinot Noir) वापराव्यात.
कांदे             : ३ मोठे 
मिरची         : १ मध्यम 
काळी  मिरी : २ लहान चमचे 

मॅरिनेड ची कृती:
१. एका बाउल मध्ये खाली कांद्याच्या चकत्या, मिरचीचे तुकडे, मिरी, घालून त्यावर चिकन चे पीसेस ठेवावेत. 
२. हे सर्व बुडेल इतपत रेड वाईन त्यावर घालून, झाकून फ्रिज मध्ये १२ ते २४ तासांसाठी ठेवून द्यावं (शक्यतो ७५० मिली वाईन पुरेशी होते). 

मुख्य कृतीचे साहित्य:
गाजर        : २ मध्यम 
मश्रूम         : ४-५ मध्यम 
बटर           : ४ मोठे चमचे  (आधीच फ्रिज मधून काढून मऊ होईपर्यंत ठेवावं)
पार्सले        : ४ काड्या
ऑलिव्ह तेल : २ मोठे चमचे (नसेल तर बिनवासाचं कोणतही)
मैदा             : २ लहान चमचे

मुख्य कृती:
१. मॅरिनेड मधून चिकन, कांदे, मिरचीचे तुकडे काढून वेगळे करावेत. 
२. उरलेलं मॅरिनेड एका पातेल्यात घालून उकळायलाठेवावं. उकळताना वर येणारे फेसाचे थर काढून टाकत राहावं. साधारण ८०% होईपर्यंत उकळावं. 
३. चिकन पुसून कोरडं  करून घ्यावं. 
४. एका खोलगट पातेल्यात १ चमचा ऑलिव्ह/इतर तेल घालून त्यात २ चमचे बटर घालावं (याठिकाणी बेकन वापरतात, पण वास आवडत नसल्याने मी वापरत नाही, तुम्ही बेकन वापरू शकता).
५. त्यावर चिकन चे तुकडे तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावेत (५-७ मिनिटे प्रत्येक बाजूने) आणि एका प्लेट मध्ये काढून ठेवावेत. 
६. त्याच तेलात मॅरिनेड मधून काढलेला कांदा, मिरच्या थोड्याश्या भाजून मग त्यात गाजराचे तुकडे घालावेत.
७. गाजर मऊ झालं, कि त्यात भाजलेलं चिकन घालून, वरून आटवलेली वाईन घालावी. पाणी घालून रस्साभाजीसारखा पातळपणा आणावा. काहीजण चिकन स्टॉक पण घालतात. तो असेल तर उत्तम.
८. हे संपूर्ण मिश्रण १५ मिनिटे उकळावे. एका बाजूला पॅन मध्ये बटर गरम करून मश्रूम च्या चकत्या त्यात भाजून घ्याव्यात. मश्रूम मऊ होऊन त्यांचा वास कमी व्हायला हवा. मग ते मश्रूम पण मिश्रणात घालावेत. 
९. उरलेल्या २ चमचे बटर मध्ये २ चमचे मैदा घालून फेटून त्याचा गोळा करावा. ह्याला बुएर- मॅनी (Beurre-Manie) म्हणतात. आणि तो मिश्रणात घालून एकसारखं मिश्रण ढवळून घ्यावं . त्याने घट्टपणा येतो. 
१०. मग हे मिश्रण एका भांड्यात काढून OTG ला १२०° सेल्सिअस ला ४० मिनिटे ठेवावे. 

गरम गरम सर्व करावे. हे नुसतंच किंवा ब्रेड सोबत खाल्लं जातं.


मॅरिनेडचं साहित्य (चिकन, कांद्याच्या चकत्या, मिरची, वाईन आणि मिरी)

एका भांड्यात खाली कांद्याच्या चकत्या, मिरच्या टाकून वर चिकन ठेवून मिरी घालावी.

हे सर्व बुडेल इतकी वाईन आणि मग प्लास्टिक रॅप ने झाकून फ्रिज मध्ये १२-२४ तास ठेवावं

भाज्या - बटाटा, गाजर आणि सोबत बटर. चिकन, कांदे, मिरची वाईन मधून काढून वेगळे करावे. 

चिकन ऑलिव्ह तेल आणि बटर मध्ये तळून घ्यावं

मॅरिनेड ची वाईन उकळून ८०% करावी 

अनुक्रमे कांदे, मिरच्या, बटाटे आणि गाजर चिकन तळलेल्या भांड्यात परतून घ्यावे. 

चिकन घालून वाईन, स्टॉक किंवा पाणी घालून उकळी घ्यावी.

वेगळ्या भांड्यात मश्रूम तळून घ्यावेत, आणि चिकन वर घालावेत.

बटर आणि मैद्याचे मिश्रण 

बटर आणि मैद्याचे मिश्रण 


OTG  ला ५० - ६० मिनिटे १२०° वर  ठेवावे. 

तयार कोक-ओ -वां

बाउल मध्ये गरम गरम वाढावे.



Wednesday 26 April 2023

मुंबई ते बेलफोर्ट

बेलफोर्ट चा प्रवास. 

काय आणि कुठून सुरु करायचं? कितीतरी लढाया वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर लढायची पहिलीच वेळ. आपण हे करू शकणार आहोत का हा स्वतःला पडलेला पहिला प्रश्न. आणि हे करायचंच आहे का? हा दुसरा. चांगलं चाललंय कि सगळं. कशाला उगाच हजारो किलोमीटर दूर जाऊन पडायचं? वगैरे वगैरे. 

तर तयारीची पहिली सुरुवात झाली Aviophobia पासून. आणि मुळात Cleithrophobia असल्याने विमान ही त्या भीतीची अत्युच्च पातळी. नुसतं एअरपोर्ट चं नाव काढलं कि अंगावर काटा यायचा. आता हे एवढे मोठं मोठाले विमान प्रवास झाल्यानंतर त्या phase बद्दल हसू येतं, पण ते जे काही होतं, अगदी खरं होतं आणि तेव्हा माझ्यासाठी अशक्य होतं. रात्रीतून अचानक दचकून जाग  यायची, पोटात आतड्यांना पीळ पडतोय असं वाटायचं, भूक नाही, काही करायची इच्छा नाही. वेगळीच मनस्थिती होती. शेवटी दीपाली पुरंदरे यांना गाठलं. प्रचंड सकारात्मक बाई. त्यांनी नुसतं good morning इतकं  म्हटलं फोन वर  तरी मन हलकं होऊन जायचं. त्यांना बोललो सगळं जे काही आहे ते सुरुवातीपासून सांगितलं. पॅनिक अटॅक, मग तो पॅनिक अटॅक कुठेही येण्याची भीती, मग त्यातून पॅनिक अटॅक आला तर पटकन निसटता येणार नाही अश्या जागांची भीती आणि मग जिथे जाईल तिथे exit शोधण्याची लागलेली मानसिक सवय, खूप मोठा struggle होता. पण दीपाली  च्या नुसत्या counselling ने माझा वर्षा नु वर्षे सुरु असलेला struggle  थांबवला. मला नवीन विचार करण्याची दिशा दिली. फेसबुक वर Cleithrophobia सपोर्ट ग्रुप जॉईन केला. त्यातून पण बरीच माहिती मिळत गेली. आणि मी हळू हळू स्वतः ला बदलू शकलो. अजूनही ती प्रोसेस सुरू आहे. जमेल हळू हळू, मग शुभम च्या मदतीने आणि दीपाली  च्या भरवशावर थरथरत्या हाताने मुंबई अहमदाबाद विमानाचं तिकीट काढलं. कसंबसं स्वतः ला ढकलत ढकलत का होईना एअरपोर्ट वर  गेलो आणि पहिला विमान प्रवास पार पडला. एक फार मोठी वैयक्तिक लढाई मी जिंकलो होतो. त्याबद्दल शुभम, दीपाली चे आभार. त्या दोघांनाही हे श्रेय जातं. 

पुढची लढाई होती ती आपल्या माणसांना सोडून जाण्याची. भारत सोडून कधीही कुठे प्रवास केला नसल्याने काय होईल याची हुरहूर, त्यातून सगळीच अनिश्चितता, मुंबई मधल्या जॉब चे संपत आलेलं कॉन्ट्रॅक्ट त्यामुळे एकमेव ऑपशन असलेला फ्रान्स. २०१७ पासून पाचेक वर्ष काढल्यानंतर मुंबई सोडून जायचं जीवावर आलं  होतं. आता हे सगळं असणार नाही अशी वेगळीच भावना होती. एक प्रकारची मानसिक सवय झाली होती सगळ्याची. एखादं  चांगलं रुजलेलं मोठं झाड अचानक उपटून दुसरीकडे लावावं असं काहीसं झालेलं. परदेश म्हणजे खूप मोठं काहीतरी, भव्य दिव्य असलं काहीतरी खूळ डोक्यात होतं. आता इथे आल्यावर ते किती छोटं आणि बिनमहत्वाचं असतं ते कळलं. पण तेव्हा अक्षरशः फक्त पाच महिने कामाला असलेल्या housemaid ने जेव्हा माझ्या भरलेल्या बॅग्ज पाहून  "भाऊ निघालात? मुंबईत आलात तर नक्की सांगा. तुम्ही आधी सांगितलं असतं तर कायतरी गिफ्ट घेऊन आले असते." म्हटलं तेव्हा सुद्धा डोळ्यात पाणी आलं. शेवटच्या दिवशी PhD ग्रुप ला शेवटचं भेटलो तेव्हा सुद्धा भरून आलं . "अब खाना कौन बनायेगा? ट्रीप प्लॅन कौन करेगा?" असं श्रुती म्हणाली तेव्हा मात्र रडू आवरलं नाही. सगळेच खूप भावुक झाले होते. अक्षरशः डोळे पुसत पुसत टॅक्सी मध्ये बसलो आणि टॅक्सी सोलापूर च्या मार्गाला लागली. 

कल्पित चं लग्न या सगळ्याच्या मध्ये आलं हा खूप मोठा रिलीफ होता. त्यामुळे सगळ्यांच्या भेटी झाल्या, एन्जॉय करता आलं. पण त्याच लग्न झालं त्या रात्री आता पुढची स्टेप म्हणजे मला निघायच आहे हे कळून खूप आत तुटल्यासारखं झालं. झोप आली नाही. मग सोलापूर ला येऊन बॅग्ज भरणे, डॉक्टर अपॉइंटमेंट, या सगळ्या गोष्टी हळू हळू सुरु होत्या. आणि जायच्या आदल्या दिवशी मात्र खूप शांत झोप लागली. बॅग्स वगैरे भरल्याने, आणि काका कांकींनी खूप छान डिनर पार्टी दिल्याने निवांत झालो होतो. 

दुसऱ्या दिवशी निघताना सुद्धा शांत वाटत होतं. अजिबात गडबड गोंधळ काही नाही. फक्त घसा तेवढा दुखत होता. आणि थोडंसं ताप आल्यासारखं वाटत होतं. विकनेस होता. काका, अर्णव आणि पजू सोडवायला येणार होते म्हणून काहीही वाटलं नाही. पण प्रवास सुरु झाला, तसं हळू हळू घसा थोडा दुखायला लागला, ताप आल्यासारखं वाटलं. त्यात न्यूज कळली कि माझी पॅरिस हुन बेलफोर्ट ला जाणारी ट्रेन कॅन्सल झाली आहे. स्ट्राईक असल्याने ट्रेन्स रद्द आहेत हा मेल आला. मग थोडासा डिस्टर्ब झालो. कारण पुढे फक्त बस हाच ऑपशन होता आणि बस पहाटे ६ वाजता पोचवणार होती मग बस स्टॉप वरून घरी कसं जायचं हा प्रश्न होता. पण बरं झालं airbnb चा मालक स्वतः गाडी घेऊन येतो म्हणाला. पण नाहक पॅरिस मध्ये हॉटेल चा खर्च वाढला. हा सगळा विचार डोक्यात चालू असताना एकीकडे अंगदुखी आणि ताप वाटतच होता. त्या सगळ्या गोंधळात काकांनी चहा साठी गाडी एका धाब्यावर थांबवली तेव्हा परत येताना मी दुसऱ्याच कार चा दरवाजा उघडला. सगळे हसले.

शेवटी रात्री चं जेवण खाण आटोपून काकांनी रात्री एअरपोर्ट ला सोडलं तेव्हा लॅब मधून यश, गोपाळ आणि योगेश आले होते. सगळ्यांना बाय करून एअरपोर्ट मध्ये शिरलो. सगळे सोपस्कार पार पडून अर्धा तास आधी गेट वर पोचलो. आणि एकदाचा सुरु झाला फ्रान्स चा प्रवास. दुखत असलेला घसा  आणि थोडासा ताप सोडला तर प्रवासात काही त्रास झाला नाही. पॅरिस ला मात्र भयंकर थंडी वाजली आणि थंडीशी जुळवून घ्यायला बराच वेळ गेला. 

सध्या हळू हळू अड्जस्ट होत आहे, नवीन गोष्टी पाहायला, शिकायला मिळत आहेत आणि मुळात हे सगळं करताना मजा येतेय ये खूप चांगलं  आहे.

त्यामुळे मुंबई ते बेलफोर्ट मध्ये जितकं भौगोलिक अंतर आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त बदल ह्या मुंबई - बेलफोर्ट प्रवासाने माझ्यात केला, आणि एक व्यक्ती म्हणून मला अंतर्बाह्य बदलून टाकलं. 

# # # 

Tuesday 24 January 2023

जाणिवेबाहेरची परिमाणे

# # # # #

विज्ञाननिष्ठ जगात जगत असताना विज्ञानाच्या मर्यादा सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे,

विज्ञानात एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रयोग असतात, आणि प्रयोगातून निघालेले निष्कर्ष एखाद्या घटनेचा कार्य-कारण भाव स्पष्ट करत असतात. पण हे निष्कर्ष आपण आपल्या पाच ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे काढत असतो. पण खरंच ही माहिती पुरेशी आहे? कान - ध्वनी, डोळे - प्रकाश, त्वचा - स्पर्श, नाक - गंध आणि जीभ - चव या पाच परिमाणांव्यतिरिक्त वस्तूची, पदार्थाची, घटनेची इतर परिमाणे असू शकतात आणि केवळ ते अवयव मनुष्याकडे नसल्याने आपल्याला त्या परिमाणांची जाणीव नसली तर? आता काही लोक म्हणतील आपल्याकडे अद्ययावत मोजमाप करणारी यंत्रे आहेत पण ही यंत्रे केवळ पाच ज्ञानेंद्रियांची एक्सटेन्शन्स आहेत. एखादं जाणिवेत नसलेलं परिमाण ती कशी सांगू शकतील? कारण माहितीचा संकलक शेवटी मेंदू आहे आणि मेंदू फक्त ज्ञानेंद्रियांपासून येणारी माहिती गोळा करू शकतो. 

एक फार रंजक काल्पनिक कथा आहे. कुठे वाचली ते आठवत नाही. संपूर्ण काल्पनिक आहे. एकदा एका वैमानिकाचे विमान हिमालयात कुठेतरी कोसळले. त्यातून वैमानिक कसाबसा वाचला आणि बाहेर आला. बाहेर येऊन त्याने पाहिलं, त्याच्या आजूबाजूला विचित्र लोक होते. त्यांना डोळेच नव्हते. डोळ्यांच्या जागी मांस होते. पडलेल्या विमानाचा आवाज ऐकून ते गोळा झाले होते. वैमानिकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांना चक्क वैमानिकाची भाषा अवगत होती. त्याला ते आपल्या गावाच्या मुख्य ठिकाणी घेऊन गेले. बोलताना वैमानिकाला कळलं की त्यांना दिवस, रात्र, उजेड, रंग याविषयी काडीचीही माहिती नाही. वैमानिकाने त्यांना दिवस - रात्र काय असतात आणि रंग काय असतात ते सांगायचा प्रयत्न केला. त्यांना काहीही समजलं नाही. त्यांनी शेवटी वैमानिकाला वेडं ठरवलं कारण डोळेच नसल्याने त्यांच्या शब्दकोशात सुद्धा वैमानिक बोलत असलेले शब्द नव्हते. शेवटी वैमानिकाने तो नाद सोडून दिला आणि त्यांच्याप्रमाणेच जगू लागला. गोष्ट इथे संपली. 

माहितीची देवाण घेवाण करण्याचे साधन म्हणजे भाषा. भाषा हे विचारांचं आदान - प्रदान करण्याचं एक अपुरं साधन आहे. कारण यात संवेदनांच्या आणि भावनांच्या स्वरूपात असणाऱ्या विचारांचं स्वरयंत्राद्वारे आधी एका ध्वनी मध्ये रूपांतर केलं. लिहिताना त्याचंच एका चित्रात किंवा चिन्हात रूपांतर केलं जातं. या ध्वनी किंवा चिन्हाला आपण अक्षरं आणि शब्द म्हणतो. कितीही केलं तरी कुठल्याही भाषेचा शब्दसंचय हा सीमित आहे. आणि नवीन शब्द निर्माण करण्याची प्रक्रिया किचकट आणि नॉन-स्टॅंडर्ड अशी आहे. अशा कित्येक भावना आहेत ज्या ध्वनी किंवा चिन्हामार्फत व्यक्त करता येत नाहीत. त्याला आपण इंट्रीन्सिक नॉलेज (intrinsic knowledge)/अंतर्गत माहिती  म्हणतो. ही माहिती आपल्याला कधीच कुणाशी बोलता किंवा कम्युनिकेट करता येऊ शकत नाही. उदा. गुलाबाचा सुगंध कसा असतो हे तुम्ही इतरांना कधीच कुठल्याच भाषेत समजावून सांगू शकत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीला स्वतः गुलाबाच्या फुलाजवळ नाक नेणं गरजेचं आहे, अगदी तसंच कोणताही आध्यात्मिक अनुभव जसं की समाधी, निर्वाण हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच जाणवू शकतं. त्यामुळेच अशा गोष्टींना वैज्ञानिक आधार असत नाही. कारण विज्ञान फक्त शब्दात व्यक्त होणारी माहिती (Extrinsic Knowledge) देऊ शकतं. 

आपणही कदाचित अशीच माणसे आहोत. विश्व काय आहे याचे संपूर्ण ज्ञान कदाचित आपल्याला कधीही होऊ शकणार नाही कारण मोजून पाच ज्ञानेंद्रिये शरीरात आहेत ज्यायोगे पृथ्वीवर आपण आजपर्यंत तरी आरामात जगू शकतो. पण अशी अनेक निनावी परिमाणे केवळ ती-ती इंद्रिये नसल्याने आपल्या जाणिवेच्या कक्षेत नाहीत आणि कधी येऊही शकणार नाहीत.

# # # # #

Friday 10 June 2022

Navy officer

 म्हणावं तर फारसा महत्वाचा नसला तरी घडला म्हणून हा प्रसंग लिहितो. 


आत्ताच काही वेळापूर्वी म्हणजे रात्री दीडच्या सुमारास मित्राकडे जेवण वगैरे करून गप्पा मारून आम्ही सायकलवर परत हॉस्टेलला येत होतो. हॉस्टेलकडे जाणारा रस्ता उताराचा आहे आणि नुकताच पाऊस पडून गेला होता आणि अजूनही पडण्याची शक्यता म्हणून आम्ही घाईने निघालो होतो. अचानक चार पाच जण हसत खिदळत रस्त्याच्या मध्ये आले. हे इकडे नेहमीचं दृश्य असतं म्हणून आम्हीसुद्धा त्यांना आहोत त्या वेगात वळसा घालून पुढे गेलो कारण वेग कमी करणं शक्य नव्हतं. सायकल घसरण्याचे चान्सेस होते. ह्या सगळ्या धावपळीत आमच्या बऱ्याच मागून येणाऱ्या चारचाकी गाडीचा वेग त्या ड्रायवरला नाईलाजाने कमी करावा लागला. मुळात कॅम्पस रोडचं स्पीड लिमिट २५ आहे. बऱ्याच लोकांना हे २५ माहीतसुध्दा नसेल. पण रात्रीचा रिकामा रस्ता पाहून मोह कुणाला आवरतोय?


आता दुसरा कोणी ड्रायवर असता तर ही परिस्थिती पाहून निमूट निघूनही गेला असता. पण हा ड्रायवर एन्टायटल्ड निघाला. साधारण लेट थर्टीज असावा. 

I'm honking and you're still coming in my way with your bicycle? 


जेवण वगैरे भरपूर झाल्याने मी पण तयारीतच होतो. मी म्हणालो, first of all speed limit for this road is 25. It's inside the campus. I'm pretty sure you were overspeeding. Otherwise why would you honk for overtaking?


मग तो चिडलाच. You know who you're talking to? I'm a Navy officer on deputation. Don't teach me the rules. 


आता खरं कारण मला समजलं. मी हसत हसत म्हणालो doesn't make you eligible for overspeeding. And you're driving car. Better safety and skid control than my bicycle. 


डोकं हलवत खांदे उडवत तो झपाट्याने पुढे निघून गेला आणि पुढे १०० मी वर जाऊन पुन्हा थांबला. पुन्हा मला थांबवलं. बऱ्याच मऊ आवाजात मग हिंदी वाणी सुरू झाली. देखो ऐसे आप बीच में आओगे तो हमे भी तकलीफ होगी ना. वगैरे वगैरे. मग तुम्ही कुठचे वगैरे. मी सांगितलं सोलापूर. तो म्हणाला I'm from Dehradun. मी म्हणालो लगा ही था मुझे. मग म्हणे कैसे क्या ?

म्हटलं जिस तरह से आपने बोला "तुझे पता है तू किस्से बात कर रहा है?" दोघेही हसलो. 

ओळख वगैरे झाली. आणि बाय बाय करून हॉस्टेल ला पोहोचलो. 


Tuesday 30 November 2021

अप्रेषित

प्रिय दादा,

शेवटी हे अप्रेषित पत्र लिहायची वेळ आलीच. विश्वाच्या अथांग प्रतलावर आपण सगळेच कुठेतरी पुन्हा भेटू तेव्हा कदाचित हे पाठवेन. मी आता आनंदी आहे, पण काळीज घट्ट करून आनंदी राहताना तुमच्या आठवणींची कोवळी सल अजूनही मनात आहे. असं अचानक तुमचं शांत होणं माहीत असतं, तर आधीच तुमच्याशी अमुक बोललो असतो, तमुक केलं असतं, याची उजळणी मनात परत परत होत राहते. मृत्यू - म्हटलं तर एक नैसर्गिक अवस्था, म्हटलं तर एक अगम्य गूढ. जणू एखादं सुरेल गाणं अर्ध्यातच थांबावं आणि पुढे भीषण शांतता पसरावी तसं काही. देहाच्या जाणिवेपासून जाणिवेपलीकडे जाण्याच्या प्रवासात नक्की काय दुरावतं? आपसातले संवाद, विचारव्यापार, अस्तिभाव अचानक नाहीसे होतात तेव्हा मनाची त्रेधा उडते. आता इथून पुढे हे सगळं असणार नाही हा विचार अंगावर काटा आणतो. एखाद्या क्षणी वाटतं की सगळं पुन्हा एकदा पहिल्यापासून घडावं. तुमच्या समक्ष घडलेलं मुक्त बालपण, शिस्तप्रिय विद्यार्थीदशा आणि मग जबाबदारीचं तारूण्य. पुन्हा एकदा हे सगळं आयुष्य तुमच्या सहवासात आणखी संगतवार जगायला मिळावं. कदाचित मग पत्र लिहिण्याऐवजी बाजूला बसून हे सगळं आधीच तुमच्यासमोर बसून बोललो असतो. किंवा नसतोही - गरजही नसती. पण हे नेहेमीच असं होतं - सरबताचा पेला रिकामा झाला, की तळाशी न विरघळलेली साखर दिसावी, तसं सगळं काही नंतर आठवायला होतं, पण वेळ गेलेली असते.

नीट आठवलं की लक्षात येतं, आमच्या थोड्याफार महत्वाकांक्षा म्हणजे तुम्हीच कधीकाळी पेरलेली बीजं, ज्याचे आज मोठाले वृक्ष झालेत. आपणही मोठं काही करू शकतो हा तुम्हीच जागवलेला विश्वास अन आश्वस्त आधार. तुमचा खंबीर आधार नसता तर आज आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात एकाच हिंमतीची नक्षत्रे कशी चमकली असती? तुम्ही एखाद्या चिरेबंदी दगडाप्रमाणे स्वतःला पायात गाडून घेतलं, त्याची परिणती म्हणूनच आमच्या आयुष्याच्या इमारती अस्खलितपणे उभ्या राहू शकल्या. आज जेव्हा आम्ही आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी खटपट करत आहोत, अनेक प्रश्न घेऊन झगडत आहोत, तर त्याकाळी नारीसारख्या खेड्यातून बाहेर पडून कोणत्याही ठोस मदतीशिवाय थेट रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर होण्यापर्यंतचा प्रवास हा किती मोठा संघर्ष असेल याची फक्त कल्पनाच स्तिमित करून सोडते.

जन्म, व्याधी, जरा, मृत्यू या त्रिकालाबाधित सत्याशी कसंबसं जुळवून घेत अस्थी गोळा करताना तुमच्या राखेला स्पर्श केला तेव्हा वाटलं, जरी अग्नीने देहाची राख केली असली, तरी तुमच्या संस्कारांची, हिमतीची राख करेल असा अग्नी या विश्वात अजून जन्माला यायचा आहे. तुमचे संस्कार आणि आदर्श चिरंतन आहेत आणि आम्हाला ते मार्गदर्शन करत राहतील.

कित्येक शतकांच्या, पिढ्यांच्या दीर्घ ओळीला तुम्ही तळमळीने एक आकार दिला. इथून पुढच्या अनेक पिढ्यांत आता हा ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत राहील. हा विचारच इतका ऊर्जादायी आहे, कि इथून पुढल्या अगणित पिढ्या जर सुखी होणार असतील, तर त्या केवळ तुम्ही केलेल्या  कष्टांमुळे आणि घेतलेल्या निर्णयांमुळे. परिघवर्ती दुःखाच्या गाभ्यात हे एक समाधानाचं रोपटं पालवतं आहे. तुम्ही ही शिकवण दिलीत की, आपलं जीवन हे कधीच सर्वस्वी आपलं नसतं, आपण आज करत असलेल्या कामामुळे, आज घेतलेल्या निर्णयांचा आपल्या पुढील कित्येक पिढ्यांवर चांगला - वाईट परिणाम होणार असतो, म्हणून आपली स्वतःची जबाबदारी फार मोठी असते आणि ती प्रत्येकाने पार पडायलाच हवी. एक-एक दिवस मागे पडत जातो, तसं तुमचे कष्ट आणि साधेपणा आठवत राहतो. आजही जेव्हा आमची वाट अंधारलेली असते, तेव्हा आमच्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षांचं स्मरण होतं आणि आमची वाट हजारो लामणदिव्यांनी आपोआप उजळून जाते.

शेवटी आपण सगळे एकाच रेल्वेचे प्रवासी. कुणाचं स्टेशन लवकर येईल तर कुणाचं उशिरा, एवढंच काय ते. कधीतरी तुम्ही पुन्हा भेटालही, की आणखी पुढे निघून गेला असाल? माहीत नाही. पण जिथे कुठे असाल तिथे हा एवढाच निरोप की, तुम्ही कधीकाळी एकट्याने अंधारात पेटवलेला दिवा अजूनही उजळतो आहे आणि तो तसाच उजळत राहील याबाबत निश्चिन्त असा.

तुमचाच,

पुष्कर


Thursday 18 March 2021

संधिप्रकाश

 # # # # #


संध्यासमयीची स्तब्ध झाकोळ पसरत जाते

तेव्हा अणकुचीदार होत जातात 

अवैध भावनांचे कोपरे

पूर्वेकडच्या अंधारात 

बीभत्स

संधिप्रकाश

पश्चिमेकडच्या आभाळात

स्तंभित अहर्निशेच्या सीमारेषेवर 

आणि कातरवेळी अभिमुख होतो

स्वतःपासून स्वतःपर्यंतचा अव्याहत चालणारा प्रवास 

- पुष्कर

(१९ मार्च २०२१)


Friday 25 December 2020

एक होता ठोंबा...

 # # # # #

तर त्याचं असं झालं, की एक होता ठोंबा. 

ठोंब्याचं झोपेच्या बाबतीत नेहेमीच रडगाणं. सशाची झोप म्हणतात तशी ठोंब्याची झोप होती.  झोप म्हणून ती कशी यायचीच नाही. आणि आली तरी कधी जाग येईल नेम नाही. वारसाहक्काने मिळालेले बीपी, अँक्झायटी इ. तर होतेच. तर त्यादिवशी ठोंबा आपला थकून भागून रिसर्च आर्टिकल्स वाचून, एक्सपेरीमेंट्स करून रात्री १ वाजता त्याच्या पीजी वर आला. आशादीदी ने मोठ्या काळजीने ठोंब्याची सवय ओळखून बिसलेरी, इस्त्रीचे कपडे, इ ठोंब्याच्या रूम मध्ये ठेवले होते. 

तर नेहेमीप्रमाणे ठोंब्याने हात पाय तोंड धुतले, स्टीम घेतली (गो कोरोना गो), मोबाईल इ. इससेन्शियल्स सॅनिटाईज करून घेतले, आणि बेडवर पडला. इंदोरची ऑक्टोबर मधली रात्र. त्यातून निपाणिया सारखा सिटी आऊटस्कर्ट चा एरिया, थंड सुखद हवा सुटली होती. नेहेमीचे लेट नाईट सोशल मीडिया रिच्युअल्स होता होता ठोंब्याला कधी नव्हे ती झोप आली. ठोंबा खुश झाला. मोबाईल लांब ठेऊन दिला (रेडिएशन्स… यु नो..!!!).  आणि खिडकीतून येणाऱ्या थंड हवेच्या झुळुकेत झोपणार इतक्यात एक डास गुणगुण करीत कानाजवळून गेला. संभाव्य धोक्यासाठी खबरदारी म्हणून ठोंब्याने दुसरी उशी डोक्यावर घेतली तितक्यात एक डास पाठीला चावला आणि घात झाला. डोळ्यावर आलेली सुखकारक झोप हळू हळू उतरायला लागली, ती कायम ठेवण्याचा प्रयत्न ठोंब्याने केला आणि कूस बदलून झोपला. 

थंडगार हवेची झुळूक खिडकीतून येत होती आणि शरीर विश्रांतीचा अनुभव घेत होतं. खिडकीला जाळ्या असल्याने ठोंबा अगदी निर्धास्त होता, असेल एखादा डास असा एक दिलासा मनाला देऊन त्याने विचार सैल सोडले, तशी हळू हळू स्वप्ने तरळू लागली. आणि अचानक पायाला आणखी एक डास कचकचून चावला, आणि ठोंब्याची सुखनिद्रा भंगली. फ्रस्ट्रेशन आलं, तसं झोप उतरायला लागली, आणि थोड्याच वेळात ठोंब्याला जाणीव झाली कि बंद डोळ्यांच्या मागे आपण टक्क जागे आहोत. डोळे उघडायला हरकत नाही. आणि शेवटी ठोंबा बेडवरुन उठून डासांच्या विरोधात लढायला सज्ज झाला. प्रथमतः लाईट लावली. तसा तो लख्ख प्रकाश डोळ्यांना खुपायला लागला आणि त्याला अजूनच अलर्ट व्हायला झालं. फ्रस्ट्रेशन लेवल मॅक्स झाली तसं मग त्याने नेहेमीच्या सवयीने जागरणाची मानसिक तयारी केली. लाईट मध्ये मच्छर कमी होतात हा स्वानुभव. ठोंब्याने पहिलं तर कॉइल, फास्ट कार्ड, ओडोमोस अगदी कसलीच हत्यारं नव्हती. हे युद्ध आता केवळ मुत्सद्देगिरीच्या जोरावर लढायचं होतं. 

लाईट असल्याने डासांचा आतंक कमी झाला होता. एकच उपाय म्हणजे लाईट चालू करून झोपणे. सेन्सिटिव्ह झोपेच्या ठोंब्यासाठी हे कर्मकठीण. मग यूट्यूब वर एकामागून एक जुनी गाणी लावली तसतसं मग डोक्यातला ताण मऊ पडत गेला. जुनी गणीच अशी लिरिक्स प्रधान. एकेका शब्दांत गुंतून जायला लावणारी गाणी. असं वाटतं किती विचार करून लिहिलं असावं... "तू तू है वही दिल ने जिसे अपना कहा" सुरू झालं आणि यूट्यूब प्लेलिस्ट मोड वर गेलं.

 साधारण हे सगळं तासएक भर चाललं असेल. मग ठोंब्या जांभया द्यायला लागला. डासांचा जोर एव्हाना कमी झालाच होता. 

मग सावकाश ठोंब्याने पाठ टेकली आणि उद्या डास युद्धाची सर्व हत्यारे विकत आणायची ठरवत त्या सुखकारक विचारात कधी झोपी गेला ते त्याचं त्यालाच कळलं नाही...

Sunday 6 September 2020

मा कश्चित दुःख भागभवेत

मा कश्चित दुःख भागभवेत 

# # # # # 

झोप डोळ्यात दाटते तेव्हा वर्तमानाचे कढ मनात दाटून यायला लागतात. चांगल्या-वाईट, कठीण- मृदू, आंबट - गोड आठवणीत मन रमून जायला होतं. खिडकीबाहेरची चंद्रकोर ह्या साऱ्या सुख - दुःखांवर चांदण्याची सारखीच  पखरण करते, तेव्हा ह्या सगळ्या भवसंसाराचं फोलपण अंगावर धावून येतं.  एका कुशीवर वळताना एरवी शांत झालेलं मन विचारांत धावायला लागतं तेव्हा कुठे आतल्या असण्याची जाणीव सुस्पष्ट होत जाते. अपार दुःखाच्या घड्यांमध्ये मनाचं गुरफटून जाणं पण सवयीचं होत जातं. आपसूक दुःखाशी असणं सोयीचं होतं. सुखाची चटक सगळ्यांनाच असते. पण दुःखाची चटक एकदा लागली की की त्यातून सुटणं कर्मकठीण. दुःखाचं वलयांकित होत जाणं. (©अधोरेखित )

मुळातच तरबेज दुःखाला उसन्या मायेची पखरण करून आंजारल- गोंजरलं की ते मनातून अंगांगात वाहायला लागतं. दुःखाची कविता करून चारचौघात मांडली तरी लोक त्यातून सुख शोधतात. जग सुख साजरं करतं, पण एकदा दुःख साजरं केलं की त्याचीही आसक्ती होते. हे एक अमुक दुःख, हे एक तमुक, ते दुःख राजसी, तर हे अबोध दुःख. काहीएक दुःखाचा बोध होत नाही. ज्यांचा होतो ती दुःखे सावकाश एका कुपीत बंद करून वर नाव लिहून आत जपून ठेवली जातात. सोयीस्करपणे बाहेर काढून अंगाशी माखायला. दुःखच नसेल तर माणसं जोडली कशी जातील? दुःखाने माणसं जोडली जातात. समदुःखी. समसुखी माणसे जोडली जात नाहीत. ईर्ष्याच असते. त्यासाठी या सुवर्णवर्खी कुप्यांतलं दुःख काढून त्याचा शिडकाव केला की मैत्र वाढतं. (©अधोरेखित )

ह्या असल्या विचारांच्या गाड्या जोडत जोडत झोप गडद होत जाते. सरते शेवटी मग भावना बोथट होत जातात तेव्हा आतली एक एक निरगाठ सुटत जाते आणि श्वास मोकळे होत जातात. शेवटी दुःखाचे सोहळे रंगवून झाले  आणि नव्या दुःखाची उजळणी झाली की मग मन झोपायला मोकळं. उद्याच्या निर्धारावर मनाला अलगद मोकळं सोडलं की सगळा ब्रम्हानंदच.

# # # # #

 


Friday 24 July 2020

कोरोना लस निर्मितीचा प्रवास- Saniya Bhalerao

# # # # #

ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि फेज २ क्लिनिकल ट्रायल्स संदर्भातला एक १३ पानाचा रिसर्च पेपर वाचला जो ‘द लॅन्सेट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. “द लॅन्सेट” हे जगातील मेडिकल सायन्सच्या सर्वोत्तम जर्नल्सपैकी एक. या जर्नलमध्ये नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाने एस्ट्राझिनका या फार्मास्युटिकल कंपीनीसोबत काम करत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्स संदर्भात आणि परिणामकारकतेबाबत एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि दोन या क्लिनिकल ट्रायल्सचे डिडेल्ड रिपोर्ट्स त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये दिले आहेत. मागच्या लेखात मी सांगितलं होतं की व्हॅक्सिन तयार होणं आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्स याची प्रोसेस काय असते ते. उगाच इथे तिथे छापून येणाऱ्या बातम्या, व्हॅक्सिन कधी येणार या बाबत उलट सुलट चर्चा आणि त्यातून पसरणारा गैरसमज कमी व्हावा त्याकरिता हा लेख. (लॅन्सेट मध्ये चायना मधल्या एका कंपनीच्या व्हॅक्सीनच्या फेज २ ट्रायल्सच्या प्रॉमिसिंग रिझल्ट्सबद्दल सुद्धा छापून आलं आहे.)

 

सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छिते की हे व्हॅक्सिन विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांची नावं. ही नावं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या रिसर्च फिल्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. कारण हे लोक आमचे हिरो आहेत. यातल्या काही शात्रज्ञांचे रिसर्च पेपर्स कितीदा तरी वाचले आहेत. यांच्या रिसर्च पेपर्सना करोडो सायटेशन्स असतात आणि कित्येक वर्षांपासून हे लोक शांतपणे पडद्यामागे बसून आपलं काम करत आले आहेत आणि म्हणून यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं. ऑक्सफर्ड विद्यापिठामधील प्रोफेसर सारा गिलबर्ट, प्रोफेसर अँड्रयू पोलार्ड, जेन्नर इन्टिट्यूटचे डायरेक्टर प्रोफेसर एड्रियन हिल, जेन्नर इन्टिट्यूटमधील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर टेरेसा लॅम्बे हे या संशोधनाच्या मुख्य टीमला लीड करता आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून कित्येक नावाजलेले शास्त्रज्ञ या टीमचा भाग आहेत.

 

आता आपण ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या रिझल्ट बद्दल बघूया. तेवीस एप्रिल ते एकवीस मे या काळात फेज १ आणि फेज दोन या क्लिनिकल ट्रायल्स साधारण १०७७ पेशंट्सवर केल्या गेल्या. रिसर्च पेपर मधल्या मेथेडॉलॉजीमध्ये न पडता आपण त्यांना मिळालेल्या फाईंडिंग्ज बघूया. मी मागच्या लेखात सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हॅक्सिनचा डोस दिल्यावर कोरोना व्हायरसला व्हॅक्सिन किती प्रमाणात न्यूट्रलाइज करू शकतं यावरून ते व्हॅक्सिन कोरोना व्हायरसला रोखण्यात किती प्रमाणात प्रभावी ठरतं हे आपल्याला कळतं. यासाठी 'न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स' बघितला जातो. हे व्हॅक्सिन दिल्यानंतर नुसतेच अँन्टीबॉडीज नाही तर टी सेल रिस्पॉन्स देखील मोजल्या जातो. एलायझासारखे ऐसे (चाचणी) या करिता वापरले जातात. कोरोना झाल्यावर त्याविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीजची गरज असते आणि जर कधी आपल्याला परत कोरोना झाला तर हे 'टी सेल्स' लक्षात ठेवून परत त्याच अँटीबॉडीज बनवायची ऑर्डर देतात. म्हणून ह्युमोरल इम्युनिटी जी हे अँटीबॉडीज तयार करते आणि सेलूयलर इम्युनिटी जी 'टी सेल्स' तयार करते या दोन्हीही अत्यंत गरजेच्या आणि व्हॅक्सिन दिल्यावर हे दोनीही रिस्पॉन्स मेजर करणं आणि त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं.ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे दोनीही फॅक्टर लक्षात घेऊन सर्व चाचण्या केल्या आहेत. तर सार्स कोव्ह २ (कोरोना व्हायरस) च्या विरुद्ध मिळालेला न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स हा सिंगल डोस करिता ९१ टक्के ( ३५ पैकी ३१ सब्जेक्टस्) होता आणि डबल डोस करिता १०० टक्के ( ३५ पैकी ३५ सब्जेक्टस्) होता. बूस्टर डोस दिल्यानंतर सर्व या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या सर्व माणसांमध्ये १०० टक्के न्यूट्रलाइजिंग रिस्पॉन्स आढळून आला.

 

हा रिसर्च पेपर पूर्ण वाचल्यावर थोडक्यात इंटरप्रिटेशन असं आहे की ChAdOx1 nCoV-19 हे जे ऑक्सफर्ड विद्यापीठाचं कोरोना व्हॅक्सिन आहे, ते स्वीकारार्ह सेफ्टी प्रोफाइल दाखवते आहे. तसंच या व्हॅक्सिनचे होमोलॉगस बुस्टिंग ( म्हणजे व्हॅक्सिनचे एका पाठोपाठ काही काळाने दिले जाणारे डोसेस) अँटीबॉडी रिस्पॉन्स वाढवतो आहे म्हणजे व्हॅक्सिनची परिणामकारकता वाढवतं आहे. हे व्हॅक्सिन ह्युमोरल आणि सेलूयलर असे दोनीही इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स दाखवतं आहे आणि त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या फेज ३ ट्रायलसाठी हे एक पोटेन्शियल कँडिडेट ठरलं आहे.

 

सगळ्यात आधी हाय रिस्कमधल्या लोकांना जे समाजासाठी आपल्या तब्येतीची काळजी न करता काम करत आहेत, तसेच पासष्टवर्षांपेक्षा जास्तं वय असलेले लोक, यांना इम्युनाईज केलं पाहिजे असं इथे म्हटलं आहे. त्यामुळे आता हाय रिस्कमध्ये असणारे लोक म्हणजे हेल्थ केअर प्रोफेशनल्स, वृद्ध लोक, नर्सेस अशा सगळ्यांवर ट्रायल्स घेणं सुद्धा सुरु आहे. एकदा का फेज ३ ट्रायल्सचे सर्व रिझल्ट आले की मग लहान मुलांवर सुद्धा ट्रायल्स घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करणं हे महत्वाचं. द लॅन्सेट या जर्नलच्या एडिटोरियलमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की, "व्हॅक्सिन त्वरित बाहेर यावं या करिता ही जी काही रेस चालू आहे ती दिसते आहे. आपल्या सगळ्यांनाच एक उपाय हवा आहे पण या सगळ्यामध्ये हे विसरून चालणार नाही की उपाया बरोबरच सेफ्टी ही सर्वोच्च महत्वाची बाब आहे"

 

आता नेहेमीचा प्रश्न : मग हे व्हॅक्सिन आपल्याकडे कधी येईल?

 

आता पर्यंत आपण पाहिलं की या व्हॅक्सिनचा प्रवास कसा चालू आहे ते. ते परिणामकारक आहे हे आता आपल्याला कळलं आहे. आता त्याचा डोस किती पाहिजे, त्याची इफिकसी लेव्हल किती आहे अशा चाचण्या फेज ३ मध्ये पार पडतील. सेफ्टी स्टडीज होतील. जेव्हा फेज ३ ट्रायल्स पूर्ण होतील आणि सर्व पॅरामीटर्स वर हे व्हॅक्सिन खरं उतरेल तेव्हा या व्हॅक्सिनच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळेल. सिरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड बरोबर करार केलेला आहे त्यामुळे फेज ३ ट्रायल्स यशस्वी रित्या पार पडल्या की व्हॅक्सिन निर्मिती सुरु होईल. शास्त्रज्ञ, टेक्निशियन्स, ते सर्व लोक जे स्वतः व्हॉलेंटियर म्हणून क्लिनिकल ट्रायल्स साठी भरती झाले आहेत.. हे सर्व जण आपापल्या भूमिका निभवता आहेत. आपण सुद्धा सुजाण आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका निभावू. कोरोना संदर्भातल्या अर्थहीन बातम्या, फॉवर्ड्स पुढे न पसरवणं, पेशंट्सच्या प्रति अनुकंपा बाळगणं आणि न घाबरता शास्त्रीय दृष्टीकोनातून खबरदारी घेत जगणं.. हे करूया.

 

क्लिनिकल ट्रायल्स कशा गरीब लोकांवर घेतल्या जातात, कसे अत्याचार होतात असं काही लोकांना वाटतं पण फेअर क्लिनिकल ट्रायल्स सुद्धा होत असतात आणि एथिकल फार्मा प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने फॉलो केल्या जाव्यात याचा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या क्लिनिकल ट्रायल्स हा एक उत्तम नमुना आहे. कोरोना सारखा आजार ज्याने आज सगळ्या जगाला वेठीस धरलं आहे त्यावर व्हॅक्सिन बनतं आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. नागरिक म्हणून यात आपण काहीतरी काँट्रीब्युट करावं अशी भावना ठेवून कित्येक जण ऑक्सफर्डच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये व्हॉलेंटिअर म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांना काय वाटलं या प्रोसेसमध्ये या व्हिडीओज च्या लिंक सुद्धा देते आहे. अजून एक गमतीचा भाग हा की यामधला एक व्हॉलेंटिअर भारतीय वंशाचा होता. आपल्याकडच्या एका न्यूज चॅनेलने त्याचा व्हिडीओ घेतला. त्यामध्ये पत्रकाराने त्या माणसाला विचारलं की तुला काय वाटतं मग कधी हे व्हॅक्सिन येईल? मीडिया कन्क्ल्युजनला येण्यासाठी इतकी घाई का करतं आहे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. यात जो व्हॉलेंटिअर होता तो अतिशय समजूतदार असल्याने त्याने फेज तीन ट्रायल्स पूर्ण झाल्या की हे सांगता येईल असं म्हटलं ते उत्तम केलं पण कोणाला काय विचारायचं निदान कोरोना सारख्या पँडेमिकबाबत बातमी देताना याचं तारतम्य मीडियाने बाळगलं पाहिजे. त्यामानाने रवीश कुमार यांनी याच माणसाचा घेतलेला इंटरव्ह्यू हा जास्त सेन्सिबल वाटला. या दोनीही व्हिडीओजच्या लिंक सुद्धा शेअर करते आहे. आदर पुनावाला यांच्या इंटरव्ह्यूची लिंक देते आहे. ती पण जरूर बघा. आपल्याला जे ऐकायचं आहे त्यापलीकडे जाऊन ऐका. त्यातला मूळ मुद्दा समजावून घ्या. ऑक्सफर्डने विद्यापीठाने यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घेऊन एक छोटा व्हिडीओ काल पब्लिश केला आहे. त्याची लिंक सुद्धा देते आहे. पारदर्शकता काय असते. विज्ञानाला आणि त्यावर काम करणाऱ्या माणसांना किती अनन्य साधारण महत्व असतं ये यानिमित्ताने आपल्याकडच्या लोकांना कळेल आणि कदाचित आपल्याकडे यावर काम करणाऱ्या लोकांना निदान चिमूटभर का होईना पण मान आपल्याला देता येईल. यात व्हिडिओ आहेत जे पाहून गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. पोस्ट पब्लिक आहे. शेअर करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, स्वतः वाचा, माहिती पडताळा आणि मगच शेअर करा.

 

रेफरन्ससाठी लिंक्स देते आहे:

 

1) https://www.youtube.com/watch?v=HiLdEaSOJN4

2) https://www.youtube.com/watch?v=wPTv11qWuIQ

3) https://www.youtube.com/watch?v=-szt0u2X0WI

4)https://www.youtube.com/watch?v=LwqfZwkJtSg

5)https://www.youtube.com/watch?v=mj3kOL83mvA

6)https://www.youtube.com/watch?v=7MjBuyO_OcA

7)https://youtu.be/AbSSuz-DhFc

 

©सानिया भालेराव

२१/७/२०२०

#oxfordcovidvaccine

https://www.facebook.com/saniya.bhalerao

# # # # #


Monday 13 July 2020

ऑल आयडेंटिटीज आर इंपर्मनन्ट

# # # # #

 

विशीच्या सुरवातीलाच झेन ची ओळख झाल्यामुळे आणि त्याचं एक आकर्षण निर्माण झाल्यामुळे इंटरनेटवर मी बरंच झेन बद्दल वाचलंय, तसंच झेन च्या बऱ्याच फेमस व्यक्तींची पुस्तकं जसं की, शुंर्यु सुझुकी, थिच्च न्हात हान्ह, वाचलं आहे, आणि काही खूप सुंदर ब्लॉग्स - buddhaimonia वगैरे वाचले आहेत. 

 

शेवटी झेन म्हणजे आपलंच "ध्यान" तिकडे जपान मध्ये जाऊन "झेन" झालं, पण त्यात जे मूळ बुद्धिस्ट तत्त्व आहे, ते जापनीज लोकांनी जगवलं, संवर्धित केलं. झेन याचा अर्थ एकरूप होणे, यात अनेक प्रकार आहेत, झाझेन (बसून करायचं ध्यान, किन्हीन (दोन झाझेन च्या सेशन मध्ये चालत चालत करायचं ध्यान - mindful walking), ओरयोकी (जेवताना करायचं ध्यान - mindful eating) इत्यादी हे सगळे प्रकार झेन लाइफस्टाइल चा भाग आहेत. कोणे एके काळी मी हे सगळं डिलिजेंटली करायचो देखील (आणि आताही अधून मधून आठवेल तसं). 

 

हे सगळं वाचत असताना ह्या सगळ्यामागचा उद्देश काय आहे हा प्रश्न मला नेहेमी पडायचा. तर यावर मी जितकं वाचलं, आणि जितकं चिंतन केलं त्यात असं लक्षात आलं की, जितक्या आपल्या स्वतःबद्दलच्या कल्पना, किंवा मी पणाची भावना स्ट्रॉंग असते; मी म्हणजे अमुक, मी म्हणजे तमुक, मला हेच आवडतं, मला हेच करायचं आहे, माझे गोल्स (मटेरियलिस्टिक) हे - हे आहेत वगैरे, तितके आपण या मी पणाच्या भावनेच्या आहारी जातो. आणि त्यासोबत आपली सगळी सुखे दुःखे जोडून बसतो. उदा, कोणी काही बोललं, कि बापरेतो/ती मला असं कसं बोलू शकतो/शकते? ही भावना अर्धवट ज्ञानातून आलेली असते असं झेन मानते. स्वतःबद्दलच्या अर्धवट ज्ञानातून. कारण लहानपणापासून आपण हा "मी" चा सेन्स बाळगत आलेलो असतो. वास्तविक पाहता या सेन्स वर  आपला कसलाही कंट्रोल नाही. आपण झोपतो तेव्हा हा "मी" चा सेन्स वीक होऊन जातो. जेव्हा आपण कोणती गोष्ट तल्लीन होऊन करतो, तेव्हा हा "मी" चा सेन्स गायब होतो. मुळात हा मी चा सेन्स पूर्णतः नैसर्गिक आहे, ती निसर्गाची प्रॉपर्टी आहे. तो माझा नाही. त्याला मी माझा म्हटलं नाही तरी तो राहणारच आहे. त्याला मी स्वतःसोबत आयडेंटिफाय केलं नाही तरी तो राहणारच आहे. एवढंच काय, हे शरीर, हे मन, सर्व काही नैसर्गिक, निसर्गाच्या मालकीचं, युनिव्हर्स च्या मालकीचं आहे, हे आपोआप निपजलेलं आणि वाढलेलं आहे. त्यात "माझा" असा काही विशेष रोल नाहीच. हा जो काही कॉन्शसनेस आहे तो युनिव्हर्स च्या मालकीचा आहे, माझा त्यातही विशेष रोल नाही. मी "मी" नाहीच, तर "निसर्ग" आहे. म्हणजे कोणी मला काही बोललं, तर ते ह्या समथिंग कॉल्ड निसर्गदत्त शरीर-मन-कॉन्शसनेस ला बोललं आहे, त्यात वाईट भावना आल्या तरी त्याही निसर्गदत्त आहेत, निसर्गाच्या मालकीच्या आहेत.त्यामुळे मला त्यात दुखी होण्याचा काहीच प्रश्न नाही. त्यामुळे ह्या "मी" च्या सेन्स पासून मुक्त भावना बाळगणे आणि ती पुरती उमगणे हेच दुःखमुक्तीचे झेन आहे. 

 

म्हणून "ऑल आयडेंटिटीज आर इंपर्मनन्ट" हे तत्वज्ञान फार महत्वाचं आहे. अगदी आपलं नावही काही खरंखुरं आपलं आहे का? तर तेही कुणा भलत्यानेच ठेवलेलं आहे. म्हणजे नावही आपल्या मालकीचं नाही, तर बाकी काय घ्या? आपलं घर, कुटुंब, नाव, आडनाव, धंदा, नोकरी, कपडे, खाद्य सगळे परिस्थितीजन्य आहेत. जर नीट पाहिलं तर तिथे यातलं काहीही अबसोल्यूटली आपलं नाही. आपल्या जागी कोणीही असू शकत होतं. 

 

त्यामुळे मी अमुक अमुक डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे किंवा प्रोफेसर आहे, ह्या सगळ्या इम्पर्मनन्ट आयडेंटिटिज आहेत. आयुष्यात एकदा ना एकदा ह्या पावसाच्या पाण्यात कागदी होडी सोडावी तश्या सोडाव्या लागणार आहेत. हे भान सगळ्यांनी ठेवून जगणं महत्वाचं, म्हणजे जेव्हा सगळं सुटतं तेव्हा काहीच मागे उरत नाही. अगदी दुःखही. 

 

# # # # #

 


कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...