Sunday 24 June 2018

अदालजची बारव आणि राणी रुडाबाई

# # #

गुजरात.

अहमदाबाद शहरापासून गांधीनगरच्या दिशेने साधारण अठरा किलोमीटर गेलं, की एक अदालज नावाचं एक खेडं लागतं. एरवी अत्यंत साध्या व शांत वाटणाऱ्या खेड्यात एक खूप सुरस कहाणी दडलेली आहे. अगदी ऐतिहासिक. एक अत्यंत सुंदर बारव तेथे घडलेल्या रोमांचकारी घटनेची साक्ष देत पंधराव्या  शतकापासून वसलेली आहे. रेखीव बांधकाम असलेल्या या विहिरीची दंतकथा तितकीच गूढ आणि नाट्यमय आहे.

# # #

उत्तर गुजरात आणि राजस्थान हे पाण्याचे दुर्भिक्ष असलेले प्रदेश. जलस्रोतांचे महत्व जाणून तेथील राज्यकर्त्यांनी ठीकठिकाणी विहिरींची निर्मिती केली. या विहिरींची निर्मिती करताना स्थापत्य शास्त्राचा आविष्कार केला गेला. कारण पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अशा प्रदेशांत विहीरीचे महत्त्व जणू एखाद्या देवालायाप्रमाणे नसते तरच नवल. म्हणून शक्यतो अशा विहिरींजवळ मंदिरेही आढळतात.

विहिरीला गुजरातीत वाव असे म्हणतात. "अदालज नी वाव" म्हणजे अदालज ची विहीर. तर या विहिरीच्या निर्मितीची कथा सुरु होते पंधराव्या शतकात. सुमारे इ. स. १४९८. पूर्वी हा प्रदेश दंडाई देश म्हणून ओळखला जायचा. येथील वाघेला कुळातील राज्यकर्ता राणा वीर सिंग याने ही विहीर बांधायला घेतली. पूर्वी हा प्रदेश केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. त्यामुळे जर एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला, तर पाण्यावाचून लोकांचे हाल होत असत. यावर कायमचा उपाय म्हणून राजाने भल्यामोठ्या पाच मजली खोल व लांबरुंद विहिरीचे बांधकाम सुरु केले.

बांधकाम सुरु असताना बाजूच्या प्रदेशात राज्य करणाऱ्या मोहंमद बेगडा याने या प्रदेशावर हल्ला केला. केवळ सत्तेच्या संघर्षासाठी झालेल्या या युद्धात राणा वीर सिंग धारातीर्थी पडला. दंडाई देशाची सत्ता हाती येताच मोहम्मद बेगडा याने राणा वीर सिंग याची विधवा पत्नी राणी रुडाबाईच्या सौंदर्याविषयी ऐकले. राणी रुडाबाईचे दर्शन होताच तो तिच्या मोहात पडला. राणा वीर सिंगाच्या चितेवर सती जाण्यापासून त्याने तिला रोखले.

मोहम्मद बेगडा याने राणीला लग्नासाठी मागणी घातली. स्वाभिमानी राणीने त्याच्यासमोर एक अट ठेवली. जर अपूर्ण राहिलेल्या अदा लज च्या विहिरीचे काम बेगडा ने पूर्ण केले, तरच ती त्याच्याशी निकाह करेल. राणीच्या सौंदर्यावर भाळलेल्या बेगडा ने विहिरीचे बांधकाम करून एक अत्यंत सुंदर विहीर राणीला भेट दिली. पाच मजली पायऱ्यांची असलेल्या या विहिरीवर अत्यंत सुरेख शिल्पकला साकारली गेली होती. विहिरीच्या आवारात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेश द्वारे, प्रवेशद्वारावर कोरलेले पानाफुलांचे नक्षीदार आकार, प्रत्येक प्रवेशद्वारासमोर कोरीवकाम करून सुशोभित केलेल्या खिडक्या, हत्ती, फुले, ई. आकारांच्या दगडी पट्ट्या या सर्व बाबी विहिरीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या होत्या. विहिरीच्या भिंतींवर जलकुंभ, कल्पवृक्ष यांच्या आकृत्या कोरलेल्या होत्या. हिंदू देवी-देवतांच्या मूर्त्याही यावर कोरण्यात आल्या होत्या.





ही विहीर राणीला भेट करून बेगडा ने तिला तिच्या वचनाची आठवण करून दिली. विहिरीची पूजा होताच आपण विवाह करू असे राणीने सांगितले. वाजत गाजत, संत महात्म्यांच्या सान्निध्यात या विहिरीची यथासांग पूजा करण्यात आली. राणा वीर सिंगाचे स्वप्न राणीमार्फत पूर्ण झाले.

परंतु विवाहाच्या आधीच स्वाभिमानी असलेल्या राणीने याच विहिरीत झोकून देऊन जीव दिला. तिच्या मनात जी इच्छा होती ती तिने पूर्ण केली, शिवाय तिला नको असलेल्या बेगडाच्या संबंधातूनही सुटका करून घेतली. तर अशी आहे राणी रुडाबाई आणि अदालज च्या विहिरीची कहाणी.

# # #

No comments:

Post a Comment

कोक-ओ-वां

# # # कोक-ओ-वां (Coq-au-vin) चा शब्दशः अर्थ होतो वाईन मध्ये शिजवलेला कोंबडा. फ्रेंच लोक त्यांच्या चीझ, वाईन, ब्रेड, चिकन, बीफ आणि पोर्क यांच...