­

Thursday, 29 September 2016

माझ्या अपरोक्ष मी

# # #

ते म्हणतात
तू असा तू तसा 

कुणी म्हणतं 
तू असा तू तसा

या माझ्याबद्दलच्या वाटण्याबद्दलची
दखलपात्रता माझ्या लेखी शून्य आहे
सध्या

आधी मीही भांडायचो स्वतःशी
आपण चांगले तर जग चांगले 
या भामक समजुतीमुळे
पण शेवटी स्वतःला दाखवलेल्या स्वप्नांचे रंग
सत्यात रंगवायला जायची वाट 
माणसांमधून जाते
हे कळायला थोडासा उशीरच झाला

माणसं म्हटली की
माणूसपण आलंच की अर्थात
हजारो हेवे दावे
हजारो ईर्ष्या
हजारो आकस
हजारो न्यूनगंड 
सगळ्यांनाच थोडी हाताळता येतात?

पण शेवटी माणसांना माफ केलं 
माणसंच ती 
परिस्थितीनुरूप वागायचीच 

पण आज 
माझी हजारो प्रतिबिंब 
हजारो आरशात 
जसं एकाच चंद्राचं बिंब
नदीत, तळ्यात, विहिरीत, डबक्यात, गटारीत 
कितीक संदर्भ समष्टी समवेत
माझ्या एका असण्याचे

काही जितके चांगले असायचे
काही तितकेच वाईट
थोडाफार इकडचा तिकडचा फरक
शेवटी काय चालायचंच


म्हणूनच माझ्याबद्दलच्या वाटण्याबद्दलची
दखलपात्रता माझ्या लेखी शून्य आहे
सध्या

(पुष्कर कांबळे)

# # #


Thursday, 11 August 2016

कललेल्या उन्हाच्या आठवणी...

# # #

www.roserambles.org


    कुंद झालेल्या पावसाळी वातावरणानंतर पडलेल्या स्वच्छ उन्हाचा रंग कोणता? गेले दोन चार पावसाळे मला ह्या कललेल्या उन्हाचा मोह पडला आहे. मे - जून चं कडक ऊन वेगळं, पण हे ऑगस्ट सप्टेंबर च थोडंस हळुवारलेलं, झुकलेलं ऊन मला भलतंच आवडतं. असं वाटतं की, उन्हाचंही वय होऊन त्यात उतारवयाचा एक मऊसूतपणा आला आहे. दिवसच्या दिवस मग असे कोवळ्या उन्हाशी सलगी करत लागिरे होत जातात. आणि मग हळूहळू जाणवतं, कि रात्र आता सातच्या सुमारास होऊ लागली आहे. पूर्वी सहाच्या दरम्यान पडणाऱ्या कडक उन्हाची झळ मग कमी होत जाते. 

     अशा एखाद्या स्तब्ध, सावळ्या संध्याकाळी मी शांत निर्जन रस्त्याकडे पाहत गॅलरीत थांबतो. समोर रेशमी लालसर आकाशातून डोकावणारं पुरातन झळाळतं ऊन, आणि हातात वाफाळता कॉफीचा कप. दिवसभराचा  शीण त्या कॉफी च्या प्रत्येक घोटासोबत आणि खमंग सुगंधासमवेत कमी होत जात आहे. दूरवरून पढल्या जाणाऱ्या दुआ चे त्रोटक आवाज कानावर येतात... "ऐ अल्लाह, हमारी तौबा कुबूल फर्मा, और हमारे गुनाहों को माफ फर्मा दे... ऐ अल्लाह, जो गुनाह जानकर किये है उन्हे भी माफ फर्मा, अंजान मे हुए है उन्हे भी माफ फर्मा...हमें हर काम में उनके बतायें हुए तरिके पे चलने कि तौफिक अता फर्मा...  ऐ अल्लाह मौत तक मेरे ईमान की हिफाजत फर्मा... ऐ अल्लाह हमारी बीमारियो को शिफा दे, मेरे हाल पे रेहम कर, मुझे अमानो - अमान में  रख. मेरी रिझाकत मे बरकत दे... ऐ अल्लाह इस दुआ को जिन्होने शय किया उन्हे, उनके आल -औलाद और वालीदीन को जन्नत मे बुलंद दर्जा अता फर्मा..." ऐकत ऐकत मीही शांत होत जातो... "मौत तक मेरे ईमान की हिफाजत फर्मा..." मनुष्याच्या पतनशील स्वभावाचे किती सूक्ष्म निरीक्षण करून हे लिहिलं गेलं असेल याचा मी विचार करत राहतो. "बीमारियो को शीफा..." ज्या गोष्टी आपल्या आवाक्यात नाहीत त्या सगळ्या गोष्टींची देवाकडे याचना केली जाते. मी नेहमी ह्या दुआ ऐकून विचारात पडतो... शेवटी जगण्यासाठी लागणाऱ्या या सगळ्या साध्या गोष्टी पण आपला त्यावर काहीही कंट्रोल नाही. गरीब असो व श्रीमंत... दुआ सगळ्यांसाठी सारखीच लागू पडते... दुआ चं हे सार्वजनिक, सार्वकालिक असणंही किती काही शिकवून जातं .... 

     वातावरण मग शांत होत जातं. पक्षी किलबिल करत बाजूच्या झाडांवरती गोळा होतात. आणि उजेड कमी होत जाऊन मग झाडांच्याही नुसत्याच मग आउटलाईन्स दिसत राहतात. मी ट्रॅक्स आणि रनिंग शूज घालून सायकल वर टांग टाकून निघतो. रस्त्यात ही भली मोठी माणसांची गर्दी... वाट काढत मग तळ्याकाठी पोहोचतो. सायकल उभी करून सभोवतालच्या सुसह्य अंधाराची व्याप्ती मनात सामावत पळायला सुरुवात करतो. एक - एक - दोन - दोन. पाय, श्वास आणि उच्छवास यांची एक लय आपोआप तयार झाली की मन ऑटो-पायलट मोड मध्ये जातं. त्यात एन्डॉर्फिन्स मुळे एक हाय मिळाली की, त्या धुंदीत दोनाचे चार राउंड झाले तरी कळत नाही. मन-शरीर एक ऊर्जा होऊन जातं.

    परतीच्या वाटेवर मग लकी हॉटेलात चहासाठी थांबणं. रात्री आठ वाजताही चहा प्यायला भरभरून पब्लिक हजर. त्यांची संभाषणे कानावर येत राहतात. "क्या करें ? मारे पोट्टेकु ? ऐसा नई करना ना जी, हाथां-पावांपर मारना, पीठ पे मारना, सिर पे नई मारना जी ..." कुणी विशीतला त्रस्त बाप दुसऱ्या बापाला आपल्या कार्ट्यांबाबतचे फ्रस्ट्रेशन्स सांगत असतो. कुणी आपले कामावर बॉस सोबत झालेले "लफडे" दुसऱ्याला सांगत असतो... "नेनु चेप्प्यानु... रे पोट्टोडा, ओका झापड इस्ते पापड अयिपोताव रा... हावलेगाडू..." (मराठी भाषांतर - मी म्हणालो, अरे बुटक्या, एक झापड मारली तर पापड होशील की रे... येडछाप कुठला..." ) कुणी कॉलेज स्टुडंट दुसऱ्याला सांगत असतो, "डूड, आय हेट दिस वेदर. आय डोन्ट लाईक इट व्हेन इट्स कॉन्स्टंटली रेनींग..." दुसरा "डूड" ही तेव्हढ्यापुरता वर पाहतो, "या.. मी नीदर.." एवढच करून परत मोबाईल मध्ये गुंतून जातो. कुणी पांढऱ्यास्वच्छ झब्बा-कुर्त्यातला, दाढीवाला, शांत-समाधानी बाप सांगत असतो, "परसोच गल्फ मे दामाद के यहा जाके आया.. अलहमदुलिल्लाह सब खैरीयत बरकत है..." आपल्यालाही ऐकून मग बरं वाटतं... सरतेशेवटी चहा आणि दोन उस्मानिया संपले की ठरल्याप्रमाणे वेटर पैसे घ्यायला येतो. उस्मानिया हे इथे मिळणाऱ्या नान कटाईचं नाव आहे. 

     
श्रावणातल्या अश्या मंतरलेल्या दिवसांची ओढ सांगायची म्हटली तर बरंच काही सांगता येईल. आल्हाददायक दिवस आणि गंधाली बनून येणाऱ्या रात्री यांची लागीर भलतीच दाट होत जाते. असं वाटतं की या सगळ्या आठवणी गोळा कराव्यात आणि त्यांना नाव देऊन एका कुपीत बंद करून जपून ठेवाव्यात. न जाणो, या अस्तित्वावर पसरलेल्या आयुष्य नावाच्या संकल्पनेला समृद्ध करायला कधीकाळी त्या कमी येतील... 

Thursday, 4 August 2016

...कायो तथा याति विनास भावम |

# # #

     रात्रीचा एक वाजला होता. खिडकीच्या बाहेर भयाण शांतता.

     माझी बोटं की बोर्ड वर टक - टक करत होती. मी त्या गूढ शांततेत वाचायला काही इंटरेस्टिंग मिळतंय का ते आंतरजालावर (Internet) वर शोधत होतो. मला झेन को-आन्स (Koan) वाचायला आवडतात. को - आन्स म्हणजे जपानी बुद्धिझम मधील छोटीशी गोष्टवजा कोडी किंवा कोडीवजा गोष्ट, जी वरवर अर्थहीन वाटतात पण त्यावर चिंतन केल्यास, त्या कोड्याशी एकरूप झाल्यास, त्यातलं मर्म, central principle झेन चा अभ्यासक अनुभूत करू शकतो. ते इतरांना समजावून सांगता येईलच याची No Guarantee. तसं ही "झेन" हा तत्वज्ञानाचा, तात्त्विक चर्चा करून निष्कर्ष काढण्याचा विषय नाहीच. मुळातच तो intellect पासून चार हात लांब असणारा विषय आहे, केवळ आणि केवळ अनुभूती यावर आधारित अशी ही जीवन पद्धती आहे.

     मुळातच झेन मनुष्याला तात्त्विक चिंतनातून बाहेर पडून अनुभूतीच्या जगात घेऊन जाते. आणि ते तसंच असायला हवं. आजकाल नुसती धर्मावर चर्चा सुरु आहे. धर्माचा सराव कोणी करत नाही. झेन हा आजच्या काळातला सर्वात लागू पडणारा धर्म आहे.

     तर हे को - आन्स वर्षानुवर्षे झेन मास्टर्स कडून त्यांच्या शिष्यांना एखादं principle खरंच समजलं आहे का, याची खातरजमा करण्यासाठी सांगितले जायचे. जेव्ह्या त्या को - आन मधील आणि तुमच्यातील द्वित्व संपेल, तेव्हा उत्तर तुमच्या हातात असेल. म्हणजे मलाही त्यातलं फारसं कळतं, अशातला भाग नाहीच. पण एक कुतूहलापोटी म्हणा, किंवा घरच्या  वातावरणामुळे म्हणा, मला या विषयात रस आहे.

     उदाहरणादाखल एखादं कोआन सांगायचं झालं तर मला हे नक्कीच आवडेल -

     झेन मास्टर विचारतात, "एका हाताच्या टाळीचा कसला आवाज होतो?" (The sound of one hand clapping)

     आता "डोक्याने" विचार केल्यास असं वाटेल, की एका हाताने कशी टाळी वाजेल? विचारणारा बहुधा हुकलेला असावा. पण जर या कोआनशी एकरूप झाल्यास हळू हळू असं लक्षात येईल, की एका हाताची टाळी, आणि तिचा आवाज याचा संबंध "एका हाताची टाळी" या उक्तीशी आहे. "एका हाताची टाळी" याचा आवाज "एका हाताची टाळी" असाच होतो. एका हाताची टाळी हे केवळ एक लेबल झालं. वस्तुतः तिथे हातही नाही आणि टाळीही. एक हात आणि टाळी या तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत. आणि तुम्ही पूर्वानुभवाच्या आधारावर आणि संस्कारांमुळे गोंधळून जाऊन या पेचात अडकत आहात. ही सगळी साब्जेक्टीव्हीटी ची गम्मत आहे. ओब्जेक्टीव रियालिटी चा विचार केल्यास काहीच तसं खरं अस्तित्वात नाही हे लक्षात येतं.

     अजून एक म्हणजे "everybody is nobody" म्हणजे "प्रत्येकजण कुणीही नाही" हेही एक असंच कोडं आहे. वर्षानुवर्षे केलेल्या ध्यानामुळे मेंदूमधील काळ-ठिकाण (Time-Space) चं भान ठेवणारा भाग हा हळूहळू लहान होत जातो. कारण शून्यावस्थेत काळ-वेळ-अंतर-ठिकाण या सगळ्यापासून माणूस दूर असतो. सततच्या सरावाने मग काळ-वेळ-अंतर-ठिकाण यामुळे भासमान होत असलेली "मी" ची कल्पना हळूहळू धूसर होत जाते. यालाच "स्व-नाश" (Self Destruction) असं म्हणतात. म्हणजे "मी" हा जो काही भास आहे तो एकदा नाहीसा झाला कि मग, या "मी" शी जोडल्या गेलेल्या सर्व गोष्टी निरर्थक होतात. माझं सुख, माझं दुख. सर्व नाश पावून मन एका समान (Equanimous) पातळीवर स्थिर होतं. म्हणजे "मी" हा "मी" नाहीच, हे एकदा प्रतीत झालं, कि, कुणीच कुणी नाही हेही लक्षात येतं, "मी" आणि "जग" यातील फरक संपून जातो आणि माणूस स्वतः व भोवताल (self and surrounding) मधील फरक केवळ एक भास आहे हे लक्षात घेतो, आणि "हे विश्वचि
माझे घर" ही उक्ती सार्थ होते. Everything is it's non - self - म्हणजे कोणतीही गोष्ट ती स्वतः नसते. हे लक्षात येतं. म्हणजे हे -  कोणीच कोणी नाही. (Everybody is nobody)

अगदी याच कल्पनेवर एक मूळ पाली वाक्य येतं ते म्हणजे पुप्फ-पूजा मध्ये (पुष्प-पूजा) "पुप्फे मिलायाती यथा इदं मी, कायो तथा याती विनासभावं |" स्व या कल्पनेच्या नाशाला "विनास" म्हटलं गेलं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे ही फुले एकदिवस वाळून जातात, त्याप्रमाणे माझ्या शरीरात हा विनासभाव येऊ दे... अशी ती प्रार्थना आहे.

# # # 

Thursday, 14 July 2016

हैदराबाद - इट स्ट्रीट आणि मी.

     "वीकएंड " म्हणजे काय हे फक्त सेकण्ड आणि फोर्थ सॅटरडे-सन्डे सुट्टी असलेल्या लोकांना विचारा. पाच दिवसीय आठवडा असल्याने कामाचा लोड जाणवत नाहीच शिवाय आपण सॅटर्डे कसाही "वेस्ट" केला तरी त्याची करेक्टिव्ह ऍक्शन म्हणून आणखी एक "सोन्यासारखा संडे" मिळतो. शिवाय माझ्यासारख्या बॅचलर लोकांना बरीच कामंही असतात. सुज्ञ बॅचलर वाचकांना ते लक्षात येईलच. जसं की आठवडाभराचे कपडे धुणे, वाळवणे, कपड्यांना इस्त्री करणे, रूम आवरून ती राहण्यायोग्य बनवणे, त्यातल्या त्यात किचन आवरणे म्हणजे एक मोठा उद्योग! टेबल, खुर्च्या पुसून त्यावरची पुरातन धूळ साफ करणे, पुस्तकांचे रॅक आवरून ठेवणे, न्यूज पेपर्स नीट एकावर एक रचून ठेवणे, गठ्ठा कप्प्यात मावेना झाला, की तोच रद्दीवाल्याकडे नेऊन वजनात फसवणूक करून घेणे आणि कमीच पैसे मिळाल्याचे दुःख करणे, आरसे पुसून "हे इतकं क्लीअर दिसतं?" असे आश्चर्य व्यक्त करणे, टूथपेस्ट च्या ट्यूब वर दया येऊन ती नवीन आणणे, बेडशीट्स, पिलो कव्हर्स यांचे नैसर्गिक रंग जाऊन तिथे वेगळे रंग आले की ते बदलणे, आणि थोडंसं छान वाटावं म्हणून उदबत्ती लावणे आणि हे सगळं कमी म्हणून की काय - अंघोळ करणे - नाश्ता करणे - जेवण करणे - झोपणे - इ.इ. 

     तर असा हा वीकेंड या सगळ्या धांदलीत कसा निघून जातो ते कळत नाही. म्हणून लॉन्ग वीकेंड ला जरा कुठे बाहेर फिरण्याचे प्लॅन्स बनवता येतात. आणि मी ते करतो. अर्थात रूममेट्स-कम - कलिग्स सोबत.


# # # # #


     आता निघू मग निघू करत करत शेवटी बारा वाजलेच निघायला घरातून. बरेच दिवस झाले काही शॉपिंग केलं नाही, असा सम्यक आणि मयूरचं म्हणणं पडलं. त्यामुळे मग "इट स्ट्रीट" चा प्लॅन आपसूक डीले झाला. सुमारे दीड ते चार अक्खा हैदराबाद सेंट्रल मॉल पालथा घातल्यावर मयूरला त्याचे मनपसंत दोन शर्ट्स आणि एक पॅन्ट मिळाली. मला घ्यायची होती एक चिनो, पण रंग, साईझ, कम्फर्ट, आणि किंमत या चार गोष्टी कुठल्याच आयटम मध्ये जुळून येईनात. अगदी दोन फ्लोअर पालथे घातले तरीही. मग शेवटी कंटाळून मी तो नाद सोडला आणि एकट्यानेच फूड लाउंज कडे धाव घेतली.

     "इटालियन बी एम टी" असं नाव असलेलं सॅन्डविच मी ऑर्डर केलं. त्यात स्लाइस्ड लॅम्ब सलामी, पेपेरोनी आणि हॅम हे सगळं स्टफ्ड होतं. टेस्ट बऱ्यापैकी छान होती. ऑलिव्स, आणि यालापेनो यांचा एक वेगळाच फ्लेवर जाणवत होता. हे एवढं मोठं सॅन्डविच संपलं तरी या दोघांचा काहीच पत्ता नाही म्हटल्यावर मी बाजूच्याच होम डेकोर शॉप मध्ये घुसलो. तऱ्हेतऱ्हेचे दिवे, धूपदाण्या, बरण्या आणि पॉट्स पाहून फार छान वाटलं. तेवढ्यात मयूर चा फोन. अरे आम्ही आलोय. चल काहीतरी खाऊ. शेवटी हो नाही करता करता एक व्हॅनिला सॅन्डविच झालंच. शेवटी शॉपिंग आटोपून "इट स्ट्रीट" गाठायला साडेपाच सहा वाजले. पण एकदा इट स्ट्रीट वर पोहोचलो आणि हुश्श झालं. समोरचं दृश्य अगदीच विहंगम होतं. 

# # # # #



     "इट स्ट्रीट"... खाणं, पिणं आणि समोर पसरलेला हुसेन सागर. संध्याकाळच्या वेळी इथे आलो, तर शांत थंडगार वारा, गच्च दाटून आलेलं आभाळ आणि समोर पसरलेलं निळंशार पाणी...  भोवतालची गर्दीही मग हळूहळू मनातून नाहीशी व्हायला लागते.  तळ्याच्या काठावरून अखंड वाहणारा "नेकलेस रोड" आणि जगाला शांतीचा संदेश देणारी गौतम बुद्धांची महाकाय मूर्ती. आणि आता रीसेंटली उभारलेला भारताचा ध्वज. हा भारताचा सर्वात मोठा ध्वज हैदराबाद मध्ये उभारला गेला आहे. तर शांतपणे वाऱ्यावर लहरणारा भारताचा झेंडा. हळूहळू मनातून सगळे कोलाहल निघून जातात. भोवतालची गर्दीही मग सावकाश काढता पाय घेऊ लागते आणि मग जसा काळोख दाटेल, तसं पाणीही अधिक शांत होऊ लागतं आणि त्यासोबत आपलं मनही. ह्या एवढ्या मोठ्या तळ्यात कारंजी उडू लागतात. आणि वारं आणखीनच थंड.... 
     हातातल्या चहाच्या कपातून निघणाऱ्या वाफा. चहाचा गंध नाकात भिनतो. हातातला वाफाळता चहाचा कप जसा जसा रिकामा होऊ लागतो तसतसा संध्याकाळी ला रंग चढत जातो. आभाळ वेगवेगळ्या रंगानी उजळून जातं आणि समोरचं पाणी मग हळूहळू काळोख पिऊ लागतं. खरंच काहीवेळापूर्वी इथं फार गजबज होतं नाही? आता सगळं काळ्याकुट्ट अंधारात बुडून जातं. पाण्याच्या ठिकाणी आता फक्त एक अज्ञात काळोख. दूरवरचे दिवे पाण्यात चमकताना दिसतात. लाटांवर हलणारी चमचम. दूरवर क्रूझ दिसते. त्यावर चाललेला कोलाहल दिसतो, अस्फुट ऐकूही येतो. नेकलेस रोड अखंड... ही इतकी माणसं राहतात या शहरात? 

# # # # #

     सो, एकूण ही आजची आउटिंग बऱ्यापैकी चांगली झाली. आणि आणखी एक वीकेंड सत्कारणी लागल्याच्या फीलिंग सोबत मी घरी आलो. 

 # # # # #


Tuesday, 29 March 2016

नाईट शिफ्ट आणि मी वगैरे.

# # #

बेंगलोर च्या दोन - दोन खेपा आणि त्यातही शेवटची खेप बेंगलोर टू हैदराबाद व्हाया सोलापूर अशी झाल्याने अतिप्रचंड अशा स्वरूपाचा थकवा  होताच. त्यातून ऑफीस मध्ये पाउल टाकल्या टाकल्याच नितीन सरांचा हसरा चेहरा दिसला. सकाळी सकाळी हे एव्हडं मोठं स्मितहास्य आणि वरतून विचारपूस झाल्याने मला गडबडीची शंका आलीच होती. नतीजा - तीन दिवसांसाठी(रात्रींसाठी) नाईट शिफ्ट ची ऑर्डर! 

तसं मला नाईट शिफ्ट मनापासून आवडते. निद्रादेवीचा माझ्यावर अदरवाईजही कोपच असतो. त्यामुळे त्या वेळात काही काम झालंच तर वेळ सत्कारणी लागल्याची ख़ुशी. दुसऱ्या दिवशी नाही म्हटल तरी जरासा त्रास होतो, पण त्या त्रासापुढे ऑफिस मध्ये रात्री मिळणारी शांतता आणि बऱ्यापैकी एकांत हे नेहेमीच चांगले वाटतात.

# # #

सकाळी रूम वर आल्या आल्याच एक थंडगार हवेची एक मंद झुळूक आली. हैदराबादच्या भर मार्च महिन्यात ही अशी थंड सकाळ बरीच दुर्मिळ. कदाचित रूममेटने रात्रभर चालू ठेवलेल्या आणि अजूनही चालूच असलेल्या डेझर्ट कूलर चा हा परिणाम असावा.अगदी दहा वाजेपर्यंत बिनधास्त ताणून दिल्यानंतर चहाची आठवण झाली.

इंडक्शन वर पाणी आणि चहा उकळून झाल्यावर साखर संपल्याचा साक्षात्कार झाला. पातेलं झाकून सुटे पैसे वगैरे घेऊन निघालो. दुकानात गेलो. बऱ्याच दिवसांतून आल्याने दुकानदाराची नेहेमीची विचारपूस. क्या साब, दिखते नई आजकल? कायको? गांव को गये थे? लगा च मेरेको. ऐसा क्या? लगातार छुट्टीया आयी समझो, नही? हम्म सही है. और ब्रेकफास्ट किये, नही किये? ब्रेड नक्को? सिरफ शुगर? अय्यो... शुगर तो हो गया. कायके वास्ते लेरे? चाय के वास्ते? हम्म जर्रा बचा है डब्बे मे. अभी के लिये बस हो जाइंगा. असं करत त्याने अगदी छोटीशी पुडकी बांधून दिली. हा अगदी मी हैदराबाद मध्ये राहायला आलो तेव्हापासूनचा आमचा दुकानदार. घराबाहेरच्या छोट्याश्या पडवीत उघडलेलं दुकान आणि दुकानात बसलेला तो, त्याची गालांवर छोटेसे हळदीचे पट्टे  उमटवलेली त्याची बायको आणि कधी -मधी दिसणारा त्यांचा  'पोट्टा'.

# # #



हा वगैरे घेऊन झाल्यानंतर reflexes थोडे strong झाले. आणि झोप पूर्णपणे दूर झाली. आणि मी गेल्या दोन आठवड्यांत घडलेल्या घटनांचा विचार करू लागलो. अचानक बेंगलोर चा प्रोजेक्ट मिळणं, मी त्यासाठी बेंगलोर ला दोनदा जाणं, तिथून सोलापूर ला घरी, सोलापूर हून कोल्हापूर ला भावाला भेटायला जाणं, म्हणजे या दोन आठवड्यात माझा जवळपास तीन हजार किलोमीटरचा प्रवास झाला. प्रवासात माणूस अंतर्मुखी होतो. याला कारण असं की प्रवासात काही करायचं नसतं. लोक कादंबऱ्या वाचतात, news papers वाचतात, मोबाईल वर गेम्स खेळतात आणि सगळं करून झालं की झोपतात. माझं याच्या अगदी विरुद्ध मत आहे. प्रवासात तुम्ही स्वतःच्या अगदी जवळ असता, स्वतःसाठी काळजी करत असता आणि इतर गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतःचा जास्त विचार करता. त्यामुळे ध्यानासाठी प्रवास हा ही एक उत्तम avenue ठरू शकतो.

प्रवासात आपण एका ठिकाणाहून निघून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. पण technically, आपण स्वतः काहीच करत नाही. कुणीतरी आपल्याला पैशांच्या मोबदल्यात कुठेतरी घेऊन जातं. आयुष्याचंही असं च नाही का? आपण नेहमी एखाद्या प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात प्रवास करतो, आणि त्यात आपली फारशी भूमिका नसते. परिस्थिती आणि इतर लोक आपल्याला एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात घेऊन जातात. आपण फक्तं सुरुवात करतो, आणि एका वेगळ्या अवस्थेत, वेगळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो, ज्याची आपल्याला कसलीही कल्पना नसते. 

# # #

अचानक दार वाजलं तसं मी उठून बाहेर गेलो.

पाहिलं तर पाणी वाला. रिकामे बबल्स त्याला देऊन भरलेले घेतले, हिशोब करून तो निघून गेला,
तोपर्यंत चांगले पाचेक वाजलेच होते. परत एकदा दूध आणून मी चहाचं पातेलं इंडक्शन वर ठेवलं.

# # #

संध्याकाळ

 # # # # # सं ध्याकाळ डोळ्यांवाटे मनात उतरत जाते तसतसं  हळूहळू काहीतरी हातातून निसटत जाण्याचं भान येऊ लागतं. वारा पडतो. उजेड हळूहळू क्षीण हो...